कोरोनासोबत आता डेंग्यूचाही धोका; खबरदारी म्हणून दोन्ही टेस्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 19:17 IST2021-07-22T19:10:49+5:302021-07-22T19:17:55+5:30
Dengue with corona in Aurangabad : २०१९ मध्ये औरंगाबाद शहरात डेंग्यूने धूमाकुळ घातला होता. हजारापेक्षा अधिक रुग्ण तेव्हा आढळले होते.

कोरोनासोबत आता डेंग्यूचाही धोका; खबरदारी म्हणून दोन्ही टेस्ट होणार
औरंगाबाद : कारोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी खबरदारी म्हणून शहरात दररोज दोन हजारपेक्षा अधिक संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाला ताप असेल तर त्याची डेंग्यू टेस्टही करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आतापर्यंत ६ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय.
तिसरी लाट कधी येईल, यासंदर्भात आयएमआरने अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात आपला अंदाज व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही लाट ऑगस्ट अखेरीस येईल, असे वाटते आहे. शहरात, जिल्ह्यात डेल्टा प्लस किंवा तत्सम असा कोणताही व्हायरस आढळलेला नाही. मुंबईत किंचीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तिसऱ्या लाटेचे हे संकेतही असू शकतात, असे मनपाला वाटते आहे. त्यामुळे डेंग्यू आणि कोरोना एकाच वेळी येण्याचा धोका वाढत चालला आहे.
२०१९ मध्ये औरंगाबाद शहरात डेंग्यूने धूमाकुळ घातला होता. हजारापेक्षा अधिक रुग्ण तेव्हा आढळले होते. ६७ पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यूही झाला होता. मागील वर्षी डेंग्यूचे रुग्ण सापडले नव्हते. यंदा रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांना यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. डेंग्यूची स्वतंत्र टेस्ट केली जाते. या टेस्टला आयजीएम म्हणतात. टेस्टमुळे रुग्ण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे लक्षात येते.
दोन्ही आजारात काही लक्षणे सारखीच
कोरोनाच्या संशयित रुग्णाला ताप येतो. डेंग्यू रुग्णालाही ताप असतो. ताप असलेले रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर आल्यास कोरोना आणि डेंग्यू टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन कमी होऊ लागते. डेंग्यूमध्ये असे होत नाही. पण प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. फुप्फुसात पाणी साचते. त्यामुळे या दोन्ही आजारांपासून बचाव करणे हाच मोठा उपाय असल्याचे आरोग्य विभागाने कळविले.