डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By Admin | Updated: December 22, 2015 00:11 IST2015-12-21T23:51:29+5:302015-12-22T00:11:22+5:30
औरंगाबाद : महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून केवळ पन्नास फुटांवर असलेल्या नूर कॉलनी या वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराने आतापर्यंत दोन बालकांचा मृत्यू झाला.

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
औरंगाबाद : महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून केवळ पन्नास फुटांवर असलेल्या नूर कॉलनी या वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराने आतापर्यंत दोन बालकांचा मृत्यू झाला. परिसरातील विविध घरांमध्ये आजही २५ पेक्षा अधिक रुग्ण अंथरुणाला खिळून आहेत. सोमवारी मध्यरात्री एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. असंख्य तक्रारी करूनही प्रशासन या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
शहराच्या विविध भागांत आजही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण सापडत आहेत. डेंग्यूचा रुग्ण सापडल्यानंतरही डॉक्टर त्यावर संशयित असाच उल्लेख करीत आहेत. कारण पूर्वी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मनपाला कळवावी लागत असे. तत्कालीन आरोग्य अधिकारी खाजगी डॉक्टरांना डेंग्यू न लिहिता संशयित लिहावे म्हणून दबाव टाकत असत. त्यामुळे आजही शहरातील अनेक खाजगी डॉक्टर संशयित म्हणूनच रुग्णांवर उपचार करीत आहेत. मागील महिन्यात चिकलठाणा येथे एका डेंग्यूसदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नूर कॉलनीत दहा वर्षीय मुलगा मरण पावला. सोमवारी समिरोद्दीन फारुकी या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांपासून त्याला ताप येत होता. खाजगी डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. काल मध्यरात्री त्याची प्रकृती अधिक बिकट झाली. त्याला त्वरित एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच समिरोद्दीनची प्राणज्योत मालवली. डेंग्यूचा ताप डोक्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय करीत आहेत. कारण मृत्यूपूर्वी समिरोद्दीन डोके प्रचंड दुखत असल्याची तक्रार करीत होता. या घटनेनंतर नूर कॉलनी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.