सहा दिवसांपासून निर्जळी
By Admin | Updated: June 19, 2014 23:52 IST2014-06-19T23:52:49+5:302014-06-19T23:52:49+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावास नेमणुकीस असलेले वीज कर्मचारी दीड महिन्यापासून गायब असल्याने गावात सहा दिवसांपासून नळ पाणी योजना बंद आहे.

सहा दिवसांपासून निर्जळी
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावास नेमणुकीस असलेले वीज कर्मचारी दीड महिन्यापासून गायब असल्याने गावात निर्माण झालेला विजेचा बिघाड दुरुस्त न झाल्याने सहा दिवसांपासून नळ पाणी योजना बंद आहे. शिवाय शेतीमधील अनेक ट्रान्सफार्मर बंद पडले आहेत.
सांगवी गावासाठी सक्षम वीज कर्मचारी नसल्याने दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. अवकाळी पावसाने झालेला बिघाड दुरुस्त होत नाही. अखेर गरजवंत शेतकरी पिके वाळून जाऊ नये, म्हणून खाजगी व्यक्तीकडून दुरुस्तीची कामे करवून घेत आहेत. त्याचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नळ पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन सहा दिवस झाले. त्यामुळे गावाचा पाणी पुरवठा बंद आहे. नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. यासाठीही शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बिघडलेला ट्रान्सफार्मर बदलून घेण्यासाठी प्रयत्न चालविले असून, याच्या वाहतुकीचा भूर्दंड शेतकऱ्यांनी सोसला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब, तारा दिसतात पण वीज पुरवठा दिसून येत नाही. बिघाडाची दुरुस्ती होत नसल्याने जनावरांनाही पाण्यासाठी रानोमाळ फिरावे लागत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)
कनिष्ठ अभियंता नाही
माळुंब्रा वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याची बदली होऊन आठ महिने उलटले तरी येथील कारभार प्रभारीवर चालू आहे. त्यामुळे ग्राहकांची कामे रखडली आहेत. येथील प्रभारी अभियंत्यास काटी, सावरगाव, तामलवाडी, माळुंबा या चार उपकेंद्राचा कारभार पाहवा लागत आहे. ग्राहकाची वाढती संख्या, वीज पुरवठ्यातील बिघाड व अपुरे कर्मचारी यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी येत आहेत,