‘डीएड’ची ‘क्रेझ’ कमी; आतापर्यंत ५१ अर्ज विक्री
By Admin | Updated: June 9, 2014 00:10 IST2014-06-08T23:25:59+5:302014-06-09T00:10:33+5:30
जालना : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर डीएड् प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आता दुर्मिळ झाले आहे.

‘डीएड’ची ‘क्रेझ’ कमी; आतापर्यंत ५१ अर्ज विक्री
जालना : इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर डीएड् प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आता दुर्मिळ झाले आहे. चालु शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून सहा दिवसात फक्त ५१ अर्ज विक्री झाले आहेत.
जिल्ह्यात १३ अध्यापक महाविद्यालये आहेत. तसेच दोन हजारावर प्रवेश क्षमता आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी डीएड् उत्तीर्ण होत आहेत. मात्र, त्या प्रमाणात नोकरी मिळत नसल्यामुळे डीएड करणाऱ्यांची संख्या रोडावल्याचे स्पष्ट होत आहे. २ जूनपासून डीएड् प्रवेशासाठीचे अर्ज उपलब्ध झाले आहेत. मात्र, सहा दिवसात फक्त ५१ अर्जच विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील ‘डाएट’ महाविद्यालयासह तालुकास्थानांवरील महाविद्यालयांतून सकाळी १० ते ५ या वेळेत १६ जूनपर्यंत या अर्जांची विक्री सुरू राहणार आहे.
दरम्यान, कला, वाणिज्य विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील खुल्या उमेदवारास डीएड्मध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान ४९.५ टक्के तर मागास प्रवर्गातील उमेदवारास किमान ४४.५ टक्के गुण आवश्यक आहे. (प्रतिनिधी)