पाच नहरींच्या सर्वेक्षणाचा निर्णय
By Admin | Updated: December 11, 2014 00:45 IST2014-12-11T00:07:32+5:302014-12-11T00:45:57+5:30
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार आज महापालिकेत नहर बचाव समितीची बैठक घेण्यात आली.

पाच नहरींच्या सर्वेक्षणाचा निर्णय
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक नहरींच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार आज महापालिकेत नहर बचाव समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील पाच प्रमुख नहरींचे सर्वेक्षण आणि डागडुजीसाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील खंडपीठात सादर करण्याच्या सूचना मनपाला देण्यात आल्या.
२००३ मध्ये नहरींसंदर्भात खंडपीठात अॅड. प्रदीप देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, डॉ. रमजान शेख लिखित ‘४०० वर्षांपूर्वीच्या नहरी’ या पुस्तकाचे अवलोकन न्यायालयाकडून करण्यात आले होते.
मागील आठवड्यात याचिका सुनावणीस निघाली असता न्या. बी. पी. धर्माधिकारी, न्या. ए. एस. बदर यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपाला केल्या.
नहर बचाव समितीच्या बैठकीत आज न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत, त्यांचे पालन करावे,
असे अॅड. प्रदीप देशमुख यांनी नमूद केले.
२०१२ मध्ये उन्हाळ्यात नहर-ए-पानचक्कीचे सर्वेक्षण करण्यात आले. उर्वरित नहरींचे सर्वेक्षण मनपाने केलेच नाही. आजच्या बैठकीत नहर-ए-अंबरी, पाणचक्की, नहर-ए-थत्ते, शहानूर हमवी, किराडपुरा येथील नहरींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नहरींच्या सर्वेक्षणासाठी दहा लाख रुपयांच्या खर्चाची तयारीही मनपातर्फे दाखवण्यात आली.