घरच्या घरी गॅस तयार करण्याचा निश्चय
By Admin | Updated: June 9, 2014 01:06 IST2014-06-09T00:48:35+5:302014-06-09T01:06:02+5:30
औरंगाबाद : भाज्या, फळांच्या साली, खरकटे आणि ओला कचरा वापरून घरातल्या घरात स्वयंपाकाचा गॅस तयार करता येतो.

घरच्या घरी गॅस तयार करण्याचा निश्चय
औरंगाबाद : भाज्या, फळांच्या साली, खरकटे आणि ओला कचरा वापरून घरातल्या घरात स्वयंपाकाचा गॅस तयार करता येतो. यातून पर्यावरणाच्या संतुलनाला हातभारही लागेल, याविषयी मार्गदर्शन मिळाल्याने रविवारी अनेक सखींनी घरच्या घरी गॅस तयार करण्याचा निश्चय केला.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त लोकमत सखी मंच सदस्यांसाठी रविवारी ‘घरच्या घरी गॅस’ याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी घरच्या घरी स्वयंपाकाचा गॅस तयार करणाऱ्या गृहिणी निर्मला कांदळगावकर, सोलर ड्रायर तज्ज्ञ आश्विन पावडे, तेर पॉलिसी सेंटर (पुणे) च्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निर्मला कांदळगावकर यांनी घरच्या घरी स्वयंपाकाचा गॅस कशाप्रकारे तयार करता येतो, याविषयी मार्गदर्शन केले. घर माझे, टीव्ही माझा, अशा प्रकारे घरातील प्रत्येक वस्तूबरोबर रद्दीही माझी, असे म्हटले जाते. परंतु त्याच वेळी घरातील कचरा माझा म्हटल्या जात नाही. घरातील कचरा फेकून दिला जातो. परंतु घरात तयार झालेला कचरा माझा आहे, असे म्हणायला शिकावे. या कचऱ्याची विविध पद्धतीने विल्हेवाट लावून बायोगॅस, खत, वीज तयार करू शकतो, याविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी उपस्थित सखींनी घरच्या घरी हा गॅस तयार करण्याविषयी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन निर्मला कांदळगावकर यांनी केले. अशा प्रकारे घरातल्या घरात गॅस तयार करणाऱ्या सखींनी यावेळी आपला अनुभव उपस्थितांना सांगितला. आश्विन पावडे यांनी सोलर ड्रायरविषयी यावेळी मार्गदर्शन केले. अन्नपदार्थ अधिक दिवस टिकविण्यासाठी मोठमोठे फ्रीज लागतात. त्यासाठी वीज वापरावी लागत असल्याने खर्चही अधिक येतो. तर पारंपरिक पद्धतीने अन्नपदार्थ वाळविताना धूळ, कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यातून अन्नपदार्थांची पौष्टिकताही कमी होते. परंतु तेच अन्नपदार्थ सोलर
ड्रायरमध्ये वाळविल्यास कोणते फायदे होतात, याविषयी त्यांनी माहिती दिली.
सौर ऊर्जेचा वापर करून कमीत कमी कालावधीत अन्नपदार्थ वाळवितात येतात. त्यातही जेव्हा कांदे-टोमॅटो, पालेभाज्या, फळभाज्या स्वस्तात मिळतात, तेव्हा ते विकत घेऊन सोलर ड्रायरमध्ये वाळवायचे आणि डब्यात भरून ठेवायचे. पाहिजे तेव्हा ते वापरता येईल. हे सगळं घरच्या घरी करता येतं, याविषयी त्यांनी माहिती दिली.
प्रारंभी डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, एखादा दिवस कार्यक्रम घेऊन पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, असे नाही. मानवाची प्रगती होताना पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यापासून याची सुरुवात करता येईल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोकमत सखी मंचच्या सदस्य उपस्थित होत्या.