कृषी प्रदर्शनाच्या पत्रिकेवरून सेनेतील वाद चव्हाट्यावर
By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:39:35+5:302014-12-15T00:49:59+5:30
विजय गायकवाड, वैजापूर येथील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

कृषी प्रदर्शनाच्या पत्रिकेवरून सेनेतील वाद चव्हाट्यावर
विजय गायकवाड, वैजापूर
येथील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाजार समितीचे उपसभापती भागीनाथ मगर यांनी पक्षविरोधी काम करण्याचा सपाटा लावल्याने त्यांना या पदावरून हटविण्याची एकमुखी मागणी सेनेच्या संचालकांनी सभापती अॅड. आसाराम रोठे यांच्याकडे केली आहे. त्यांनी शिऊर येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेत सेनेच्याच नेत्यांची नावे वगळल्याने हा वाद उफाळून आला आहे, असे बोलले जाते.
यासंदर्भात अॅड. रोठे यांच्याकडे सेनेच्या ११ संचालकांनी उपसभापती भागीनाथ मगर यांची लेखी तक्रार केली आहे. मगर हे पक्षाच्या व बाजार समितीच्या हिताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही अयोग्य असल्याचे संचालकांनी म्हटले आहे.
दरम्यान, तालुक्यातील शिऊर येथे श्रीसंत शंकरस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ ते १९ डिसेंबर या दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शन हे कळीचा मुद्दा ठरल्याने या वादाला तोंड फुटले आहे. शिऊर येथे उपबाजार समिती असून, या आवारात १५ ते १९ दरम्यान कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपसभापती भागीनाथ मगर यांनी सेनेचे नेते अथवा बाजार समितीचे सभापती व अन्य कोणत्याही संचालकांना विश्वासात न घेता आपले घोडे दामटविले. त्यांनी या कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती घेत पत्रिका छापल्या; परंतु सेनेचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना यात कोणतेही स्थान न देता त्यांना डावलण्यात आले. त्यातच विरोधी पक्षाच्या नेत्यांना या निमंत्रणपत्रिकेत मानाचे स्थान देण्यात आल्याने सेनेत चलबिचल झाली अन् वादाला तोंड फुटले. त्यामुळे बाजार समितीचे संचालक दीपक राजपूत, भाऊसाहेब गलांडे, कल्याण जगताप, महावीर बाफना, अनिल आल्हाट, सुनील कदम, विजयसिंह बोडखे, गोकुळ आहेर, मंदाताई कर्डक, अशोक पगारे व ज्ञानेश्वर जगताप यांनी ागर यांची पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली. या मानापमान नाट्यामुळे कृषी प्रदर्शन उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.