औरंगाबादच्या दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:07 IST2018-02-08T00:07:17+5:302018-02-08T00:07:34+5:30
पेट्रोलपंपावर काम करणाºया मित्राला घेऊन ट्रिपलसीट घरी परतणाºया तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला. औरंगाबाद - मुंबई रोडवरील मिटमिटानजीक मदरशासमोर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ठार झालेले दोन्ही तरुण आई-वडिलांना एकुलते एक होते.

औरंगाबादच्या दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पेट्रोलपंपावर काम करणाºया मित्राला घेऊन ट्रिपलसीट घरी परतणाºया तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला. औरंगाबाद - मुंबई रोडवरील मिटमिटानजीक मदरशासमोर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ठार झालेले दोन्ही तरुण आई-वडिलांना एकुलते एक होते.
शुभम सुरेश राऊत (२१, रा. नंदनवन कॉलनी), श्रीकांत शिवाजी हिवाळे (२३, पडेगाव) हे दोघे ठार झाले. आकाश रमेश सोनवणे (२६, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) हा गंभीर जखमी झाला.
आकाश शरणापूर फाटा येथील पेट्रोलपंपावर काम करीत होता. त्याच्याकडे मोटारसायकल नसल्याने शुभम व श्रीकांत हे दोघेही मंगळवारी रात्री शुभमच्या (एमएच २० डीजी २४५९) दुचाकीवरून आकाशला आणण्यासाठी गेले होते. आकाशला सोबत घेऊन तिघेही दुचाकीवरून औरंगाबादच्या दिशेने निघाले. मिटमिटा मदरशासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत तिघेही दूरवर फेकले गेले. डोक्याला गंभीर जखम होऊन अतिरक्तस्राव झाल्याने शुभम आणि श्रीकांत दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी धाव घेत तिघांना घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. आकाशवर उपचार सुरू असून, त्याची परिस्थिती गंभीर आहे. दोन जिवलग मित्रांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली. फौजदार ठोकळ अधिक तपास करीत आहेत.
शुभम उत्कृष्ट फोटोग्राफर
नंदनवन कॉलनीतील शुभम हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याचा मोठा मित्रपरिवार होता. मित्र परिवारात तो सनी फोटोग्राफर या नावाने ओळखला जायचा. उत्कृष्ट फोटोग्राफीमुळे त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी शहरातील तरुणांची नेहमीच गर्दी होत असे.
नोकरीमुळे सोडायचे होते काम
आकाशचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. शरणापूर फाटा येथील पेट्रोलपंपावर तो लेखनिक म्हणून काम करतो. ते काम परवडत नव्हते. त्याला इतरत्र चांगली नोकरी मिळाली होती, त्यामुळे आज तो पेट्रोलपंपावरील नोकरी सोडणार होता, असे त्याने कालच मित्रांना सांगितले होते; मात्र पंपावरील शेवटच्या दिवशीच काळाने त्याच्या मित्रावर घाला घातला. तो ही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.