अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST2018-12-24T00:14:24+5:302018-12-24T00:14:52+5:30
सुट्यांमुळे संख्या वाढली : एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांचे हाल

अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी
फर्दापूर : वर्षअखेर व नाताळच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे; परंतु नेहमीप्रमाणे एस.टी. महामंडळाने प्रदूषणमुक्त बसेसची संख्या न वाढविल्याने रविवारी पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.
नाताळाची चाहूल लागताच लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली खरी; पण एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांना उन्हात रांगेत उभे राहून बसची वाट पाहावी लागली. ‘सदा मरे, त्याला कोण रडे’ असा कारभार एस.टी. महामंडळाचा झाल्याने गर्दी वाढताच पर्यटकांची गैरसोय होणे, हे जणू गणितच बनले आहे.
रविवारी सकाळी पर्यटकांची संख्या वाढली तेव्हा फक्त सहा बसेस धावत होत्या. त्या अपुऱ्या पडत होत्या. त्यानंतर २ वाजता तीन बसेस मागविण्यात आल्या. त्यात एक मिनी बस खराब असल्याने ती बंद होती. एसटी महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळत असूनही पर्यटकांचे हाल होतात, ही खरी शोकांतिका आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी येथे होत असताना प्रत्यक्षात पर्यटकांसाठी कुठलीही सुविधा नीट नसल्याने पर्यटक नाराज होऊनच परतत असतात. कोट्यवधीचे अभ्यागत केंद्र फक्त वाहनतळ बनले आहे.
आगारप्रमुखांना कळवूनही दुर्लक्ष
पर्यटकांची हेळसांड होऊ नये म्हणून येथील पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर यांनी सोयगाव आगारप्रमुखांना बसेस, चालक व वाहक वाढविण्यासाठी पत्र देऊनही उपयोग झाला नाही. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.