धक्कादायक... औरंगाबादेत एकाही ‘आयसीयू’त बेड शिल्लक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:42 IST2020-09-09T16:38:55+5:302020-09-09T16:42:51+5:30
शहरातील ४०० ते ५०० गंभीर रुग्णांना अत्याधुनिक सुविधा व उपचारांची गरज आहे;

धक्कादायक... औरंगाबादेत एकाही ‘आयसीयू’त बेड शिल्लक नाही
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाणही चारपट झाले आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आयसीयू बेडची नितांत गरज असताना एकाही रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी निदर्शनास आली. आता आयसीयूमध्ये बेड वाढवायचे तरी कसे, असा प्रश्न रुग्णालयांसह प्रशासनाला भेडसावत आहे.
सध्या शहरी भागातील ३ हजार ७२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील ४०० ते ५०० गंभीर रुग्णांना अत्याधुनिक सुविधा व उपचारांची गरज आहे; परंतु खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष फुल झाले आहेत. त्यामुळे काही गंभीर रुग्णांना सामान्य कक्षात आॅक्सिजन लावून ठेवले आहे. ‘लोकमत’ने सर्व रुग्णालयांचा आढावा घेतला असता अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या. मागील २४ तासांपासून शहरातील एकाही रुग्णालयात आयसीयू बेड शिल्लक नाही. या स्थितीत एखाद्या रुग्णास श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याला कुठे हलविणार? घाटीसह खाजगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना फक्त आॅक्सिजन लावून उपचार केले जात आहेत. दरम्यान कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांवर घरातच उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी पॅकेज पद्धतीचा अवलंब केल्यास रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी कमी होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एका बप्तठकीत व्यक्त केला.
६ महिन्यांत तयारी शून्य
कोरोनाचा संसर्ग मागील ६ महिन्यांपासून थैमान घालत आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून दिले. मात्र, गंभीर रुग्णांसाठी बेडची संख्या वाढविली नाही. आता अचानक शहरातील सर्व रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष हाऊसफुल झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत.
ऑक्सिजनचाही तुटवडा : महापालिकेतर्फे चिकलठाणा येथे मेल्ट्रॉन हॉस्पिटल चालविण्यात येत आहे. तेथे २४० रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. मागील ५ दिवसांपासून आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून विलंब होत आहे. असाच त्रास शहरातील इतर खाजगी रुग्णालयांना सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २०, १७६ रूग्ण बरे झाले आहेत. #coronavirus#aurangabadhttps://t.co/pO4HETFyM8
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 9, 2020
शहराची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर
रुग्णालय क्षमता रुग्ण आयसीयू बेड शिल्लक
एमजीएम २५२ २३० ६३ ०
धूत ९० ९० १५ ०
बजाज ४५ ४५ १० ०
हेडगेवार ६५ ६५ १० ०
सिग्मा ३५ ३५ ०५ ०
एम्स ३५ ३५ ०३ ०
आशिष १४ ०५ २० ०
लाईफ लाईन २४ २६ ०४ ०
सावंगीकर २० २० ०४ ०
वाय.एस. खेडकर ६० ४२ १० ०
एशियन ४० ४३ ०७ ०
ओरियन ३५ ३५ ०५ ०
धनवई १४ ०७ ०२ ०
घाटी ४५८ ३०० १२८ ०
सिव्हिल हॉस्पिटल २०० २०५ १० ०
मेल्ट्रॉन २४० २४० ३० ०
धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यातhttps://t.co/CypzMkfzJi
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 9, 2020