corona virus : दररोज रात्री ७ ते ११ वाजेदरम्यान पोलीस रस्त्यावर; शहरात संचारबंदीची कठोर अमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:52 IST2021-03-26T18:51:58+5:302021-03-26T18:52:25+5:30
corona virus in aurangabad शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे.

corona virus : दररोज रात्री ७ ते ११ वाजेदरम्यान पोलीस रस्त्यावर; शहरात संचारबंदीची कठोर अमलबजावणी
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची काटेकोरपणे अमलबजावणी सर्व ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत रस्त्यावर उभे राहून नाकाबंदी आणि गस्त करीत असल्याचे दिसून आले. याविषयी स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले होते.
शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवारी, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन करून फिरताना दिसतात. रात्री ८ वाजता दुकाने बंद केल्यावर घरी जाण्यासाठी ते गर्दी करतात. यामुळे आठ वाजता रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते. ही बाब समोर आल्यावर रात्री साडेसात अथवा त्यापूर्वी दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यास सांगितले जात आहे.
शहरातील काही कॉलनीत व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो तर काही व्यापारी रात्री ८ वाजल्याशिवाय शटर खाली करीत नाहीत. परिणामी पोलिसांना दंडुका दाखवून दुकाने बंद करावे लागत आहे. गुरुवारी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील हे स्वतः गुलमंडी, शहागंज, टिळकपथ आणि शहरात गस्तीवर होते. प्रत्येक पोलीस ठाण्यातील ३३ टक्के अधिकारी-कर्मचारी यांना रोज रात्री ७ ते ११ पर्यंत बंदोबस्ताचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.