चिंतन बैठकीतून कानउघाडणी!
By Admin | Updated: May 19, 2014 01:07 IST2014-05-19T00:42:31+5:302014-05-19T01:07:29+5:30
जालना : लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या

चिंतन बैठकीतून कानउघाडणी!
जालना : लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पं.स. सदस्यांनी आपापल्या प्रभागात, गणांमध्ये राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी सूचना आ. कैलास गोरंट्याल यांनी केली. यावेळी त्यांनी काही नगरसेवकांची कानउघाडणीही केल्याचे समजते. आ. गोरंट्याल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत आ. गोरंट्याल यांनी मार्गदर्शन केले. मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांची जनजागृती करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, असे आवाहन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत गतवेळी जालना विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले होते. आजपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत. राज्य-केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजना तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असे गोरंट्याल यावेळी म्हणाले. नगरसेवकांनी प्रभागातील रहिवाशांच्या अडीअडचणी जाणाव्यात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. नगर पालिकेच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीत निवडणुकीत काम न करणार्या काही कार्यकर्त्यांची कानउघडणी करण्यात आली. जनाधार नसलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढे तोलून-मापून बोलावे, असे सांगण्यात आले. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना आणि मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण, जिजामाता प्रवेशद्वार, १३ विविध ठिकाणी हायमॅक्स दिले लावण्यात आले. अनेक भागात जलवाहिनीतून नळाचे पाणी पोहोचविण्यात आले. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १० कोटीतून विविध विकास कामे करण्यात आली. याशिवाय आमदार स्थानिक विकास निधीतूनही जनकल्याणाची कामे केली आहेत. सर्वच नगरसेवकांनी आपल्या भागातील विकास कामांची जनजागृती करून लोकापर्यंत जा, अशी सूचना आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. राज्य शासनाने घरकुल योजनेचे सर्वेक्षण केले आहे. आता लवकरच कामांना सुरूवात होणार आहे. त्यासाठी नगरसेवकांनी श्रेय लाटणार्यांना त्यांची जागा दाखवून आपला मुद्दा उचलून कोणीही स्वत:चे बॅनर लावणार नाही, याची खास काळजी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी) लोकांपर्यंत पोहोचण्याची सूचना तीन महिन्यांपर्यंत नगरसेवकांनी आपला वॉर्ड सोडून बाहेर न जाण्याचा सल्ला आ. गोरंट्याल यांनी दिला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय नळाच्या पाण्याचे नियोजन करून आप-आपल्या वॉर्डातील नागरिकांना पाच-सहा दिवसातून एकदा पाणी मिळेल, याची काळजी घेण्याची सूचना दिली. बैठकीस अपक्ष नगरसेवक उपस्थित गेले दोन दिवस झालेल्या बैठकांमध्ये पहिल्या दिवशी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रविवारच्या बैठकीत सर्व नगरसेवक व काही अपक्ष नगरसेवकही उपस्थित होते. शहरातील वॉर्डात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी हालचाली कराव्यात अशी सूचनाही गोरंट्याल यांनी दिली.