काँग्रेस मंथनात; भाजपाची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: May 24, 2014 01:36 IST2014-05-24T01:24:57+5:302014-05-24T01:36:21+5:30
रमेश कोतवाल, देवणी लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याने आता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मंथनात गुंतले आहेत.

काँग्रेस मंथनात; भाजपाची मोर्चेबांधणी
रमेश कोतवाल, देवणी लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याने आता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मंथनात गुंतले आहेत. तर प्रारंभीपासूनच भाजपाला मानणारा मतदार या भागात असला, तरी मोठे मताधिक्य यावेळी मिळाल्याने भाजपाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवणी तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४५ ग्रामपंचायती व ३५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांपैकी ३० सोसायट्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागा आहेत. त्या तिन्ही जागा काँग्रेसकडेच आहेत. पंचायत समितीही काँग्रेसच्याच ताब्यात असताना लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत देवणी तालुका हा भाजपाच्या बाजूने अधिक असतो. जिल्ह्यातील मातब्बर पुढार्यांमध्ये देवणी तालुक्यातील काही पुढार्यांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण ६० गावांपैकी फक्त गुरनाळ व आंबा नगर या दोनच गावांतून काँग्रेसला किरकोळ आघाडी मिळाली आहे. इतर सर्व गावांत शेकडो मतांनी भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. मोदी लाटेचा परिणाम देवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिवाय, काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात हयगय केल्यामुळे बहुतांश गावांत पिछेहाट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेत असलेल्या या पुढार्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचे वजन घटल्याने ते कसे वाढविता येईल, यावर विचारमंथन केले जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये फारसे बहुमत नसलेल्या भाजपाच्या नेत्यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मतदारांनी वाजविलेली ही धोक्याची घंटा आगामी निवडणुकीत काय परिणाम करणार, याविषयाच्या चर्चाही तालुक्यात रंगल्या आहेत. तालुक्यातील सर्वच काँग्रेस पुढार्यांच्या गावातून यावेळी प्रथमच भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. डोंगरेवाडी येथे तर काँग्रेसला फक्त ८ मते मिळाली आहेत. एकंदरित, पराभवाने खचलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंथन सुरू केले असून, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचे काम करण्यासाठी ते कामाला लागले आहेत. बहुतांश पुढार्यांनी गावात नमस्कार वाढविला असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. नुसती आश्वासने देऊन मते घेणार्या पुढार्यांना झटका बसल्याने आता सत्ताधारी पक्षातील सर्वच पुढारी कामाला लागले आहेत.