साथ द्या रे साथ..हातात हात..पाण्याला वाट !

By Admin | Updated: May 22, 2014 00:16 IST2014-05-22T00:03:56+5:302014-05-22T00:16:04+5:30

पंकज कुलकर्णी , जालना पाण्याच्या एक-एक थेंबाची बचत व त्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी ‘साथ द्या रे.. साथ द्या... हातामध्ये हात द्या... पाण्याला वाट द्या...’ असे आवाहन मान्यवरांनी केले.

Come along. | साथ द्या रे साथ..हातात हात..पाण्याला वाट !

साथ द्या रे साथ..हातात हात..पाण्याला वाट !

पंकज कुलकर्णी , जालना पाण्याच्या एक-एक थेंबाची बचत व त्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी ‘साथ द्या रे.. साथ द्या... हातामध्ये हात द्या... पाण्याला वाट द्या...’ असे आवाहन ‘मराठवाडा पाणीटंचाई : लोकसहभाग’ या एकदिवसीय कार्यशाळेतून मान्यवरांनी केले. येथील घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या वतीने मराठवाड्याच्या पाणीटंचाईसंदर्भात जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मराठवाड्यातील विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यांनी आपल्या प्रास्ताविकातून घाणेवाडी जलाशयाच्या लोकसहभागातून करण्यात आलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.या कार्यशाळेस श्री गुरूगोविंदसिंह अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, पाणीव्यवस्थापन विभाग नांदेड येथील प्रा. उपेंद्र कुलकर्णी म्हणाले की, सध्या हवामानात झपाट्याने बदल होत आहे. त्याचा फटका शेतीवर पडत आहे. वरचेवर पाणी संकट निर्माण होत आहे. भविष्यातही ते भयावह होणार आहे. त्यामुळेच सर्वांनी पाणी वाचविण्यासंदर्भात जागरूक राहणे गरजेचे आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबा-थेंबाची साठवणूक करणे तसेच त्याचे नियोजन करणे आता सर्वांचीच गरज बनली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे ते म्हणाले. यानंतर मंचचे सुनील रायठठ्ठा यांनी घाणेवाडी जलाशयाची पूर्वीची आणि आताची स्थिती कशी आहे, याची संगणकीय सादरीकरणाव्दारे माहिती दिली. वाढत्या नागरिकरणामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. कुंडलिका नदीवर बांधण्यात येत असलेल्या आठ बंधार्‍यांची माहिती दिली. शासनाने दिलेल्या आठ कोटी रूपयांचा निधी अद्यापही अखर्चित आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयस्तरावर मंजुरीसाठी रखडलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही रायठठ्ठा यांनी केली. लातूर येथील अरूण समुद्रे यांनी अतिशय मार्मिक उदाहरणे देत ‘पाणी पेरा... पाणी मिळेल...’ असे आवाहन केले. ते म्हणाले की, ४६ टक्के वेगाने शहरांमधून झपाट्याने नागरिकरण होत आहे. या नगरांमधून शेतीसाठी निर्माण केलेल्या सिंचन प्रकल्पांतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. कुठल्याही महानगर पालिका, नगर पालिकांकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे शेतीच्या पाण्यावरच सर्वजण अवलंबून आहेत, असे त्यांनी नमूद केले. येथील उद्योजक रघुनंदन लाहोटी यांनी रोहणवाडी गाव दत्तक घेऊन वर्षभरात केलेल्या जलसंरक्षणाच्या कामांची माहिती दिली. लाहोटी यांनी तीन शिरपूर पॅटर्नचे बंधारे निर्माण केले. तलावाचेही पुनरूज्जीवन केल्यामुळे जलसाठ्यांपासून सुमारे पाच कि़मी. चे क्षेत्र ओलिताखाली असल्याचे नमूद केले. विहिरींची पाणीपातळीही कमालीचीही वाढल्याचे सांगितले. त्याचबरोबर गावात पन्नासहून अधिक स्वच्छतागृह बांधण्यात येत असून, येत्या काही महिन्यांतच रोहणवाडी हे आदर्श गाव निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष रमेशभाई पटेल यांच्याहस्ते लाहोटी यांच्यासह रोहणवाडी गावातून आलेल्या दहा ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. मंचाचे सचिव शिवरतन मुंदडा यांनी शहरातून वाहणार्‍या सीना व कुंडलिका नद्यांची सफाई करण्यासाठी पुढाकार घेतला. नद्यांचे पात्र वाढविण्यासह पात्र खोलीकरण, अतिक्रमण काढण्याचे कार्य हाती घेतले. विशेष म्हणजे हनुमानघाट परिसरात एक बंधारा निर्माण केला असून, त्यात कडक उन्हाळ्यातही लाखो लिटर पाणीसाठा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कुलकर्णी केसापूरकर यांनी केले. आभार हेमंत ठक्कर यांनी मानले. यावेळी मराठवाड्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, उद्योजक, उपस्थित होते. या कार्यशाळेस श्री गुरूगोविंदसिंह अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, पाणीव्यवस्थापन विभाग नांदेड, आर्ट आॅफ लिव्हींग परिवार लातूर, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळ औरंगाबाद, रा.स्व. जनकल्याण समिती, रघुनंदन लाहोटी प्रणित रोहणवाडी, सीसीआय औरंगाबाद यासह अन्य संस्था सहभागी झाल्या होत्या. या संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी जलसंरक्षण व जनजागृतीसंदर्भात विविध ठिकाणी केलेले कार्य आणि त्याचे सकारात्मक झालेले परिणाम याची संगणकीय सादरीकरणाव्दारे माहिती सादर केली. घाणेवाडी तलाव हा १९३० ते ३५ या कालावधीत बांधण्यात आला होता. हैदराबाद राज्याचे तत्कालिन निजामांनी त्यासाठी पुढाकार घेतला. बेझंजी फरीदोनजी जालनावाला यांनी या तलावाचे काम केले. या तलावाचे क्षेत्र १५ मीटर असून, लांबी २७४३ फुट तर ०.५१ टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता आहे. आजच्या घडीला फक्त ११ टक्के पाण्याचा वापर शहरासाठी होत असून, ४० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. १९६० मध्ये दिवसांतून दोनवेळा तर १९७० मध्ये दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असे. मात्र, आता आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे रायठठ्ठा यांनी सांगितले.

Web Title: Come along.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.