निविदा ओपन न केल्याने सिटी बसला ब्रेक !
By Admin | Updated: May 27, 2014 00:57 IST2014-05-27T00:34:15+5:302014-05-27T00:57:49+5:30
लातूर : केंद्राचा पहिला हप्ता १५ दिवसांत मिळून ‘दोन महिन्यांत शहरात सिटी बसेस धावणार’ असे मनपाने गाजर दाखविले होते.

निविदा ओपन न केल्याने सिटी बसला ब्रेक !
लातूर : केंद्राचा पहिला हप्ता १५ दिवसांत मिळून ‘दोन महिन्यांत शहरात सिटी बसेस धावणार’ असे मनपाने गाजर दाखविले होते. मात्र सहा महिने उलटले असले तरी निविदा प्रक्रियेच्या पुढे मनपा प्रशासन सरकले नाही. शिवाय, निविदा घेऊनही तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, पण त्या ओपन करण्यास मनपाला अद्याप वेळ मिळला नाही. त्यामुळे बसेस खरेदीचा प्रस्ताव रखडला असृून, सिटी बसपुढे सध्या तरी गतिरोधक आहे. नव्या वर्षाची नवी भेट म्हणून सिटी बसचा गाजावाजा मनपा प्रशासनासह स्थानिक नेतृत्वानेही केला होता. मनपाला १५ दिवसांत केंद्राचा हप्ता मिळेल आणि दोन महिन्यांत शहरातून सिटी बसेस धावतील, असे स्वप्न लातूर शहरवासियांना प्रशासनाने दाखविले होते. मात्र सहा महिने उलटले तरी केंद्राचा हप्ताही आला नाही, सिटी बसेस खरेदीची प्रक्रियाही पूर्ण झाली नाही. सिटी बस खरेदीसाठी तीन संस्थांनी निविदा भरल्या आहेत. या तीन संस्थांतून एकाला सिटी बसेस खरेदी परवाना मिळेल. स्थायी समितीची मंजुरी मिळल्यानंतर संबंधीत संस्था सिटी बसेसची खरेदी करणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ई-टेंडर स्वीकारण्याची मुदत होती. २८ फेब्रुवारीला स्वीकारण्यात आलेल्या टेंडरची ओपनिंग होती. आलेल्या निविदेतून बसेस खरेदीचे टेंडर दिले जाणार आहे. पण तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी निविदा उघडल्या नाहीत. त्यामुळे सिटी बस जाग्यावरच थांबली आहे. या टेंडरचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविल्यानंतर खरेदीसाठी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत धावणार्या सिटी बसचे स्वप्न सध्या तरी भंगलेले दिसत आहे. खरेदीला मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा सिटी बस चालविण्याचे टेंडर काढले जाणार आहे. चालविण्यासाठीही खाजगी व्यक्तींचा शोध ई-टेंडरिंगमार्फत घेतला जाईल. त्यानंतरच शहरात सिटी बसेस धावणार आहेत. ३८ कोटींची ही योजना नव्या सालात केंद्र व राज्याच्या मदतीने लातूर मनपाला मिळाली. परंतु, प्रक्रिया कासवगतीने होत असल्याने दोन महिन्यांचे दाखविलेले स्वप्न सध्या तरी ‘स्वप्न’च (!) राहत आहे. योजना मंजूर झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वासह आयुक्तांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पण आलेल्या निविदा ओपनिंग करण्यास वेळ मिळत नसल्याने हा प्रस्ताव सध्या तरी रखडला आहे. याची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. (प्रतिनिधी) बसस्थानक जागा निश्चिती, सिटी बसेसचा मार्ग, सिटी बस आगार, वर्कशॉप व अन्य मनुष्यबळाच्या संदर्भात अद्याप मनपाने निर्णय घेतलेला नाही. प्रस्तावासोबत या संबंधीची माहिती जोडण्यात आली असल्याचे सांगितले जाते. सिटी बसेस खरेदीची आॅर्डर प्लेस झाल्यानंतरच मनपा या बाबींकडे लक्ष देणार असल्याचे दिसत आहे. विवेकानंद चौकात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजन आहे. विवेकानंद चौकात पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. या पार्किंगमध्ये सिटी बस थांबतील असे नियोजन आहे. पण सर्व काही टेंडर ओपन झाल्यानंतरच आहे. बस व्यवस्थापनाचे टेंडर... केंद्राने मंजुरी दिलेल्या निधीतून ६० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यात अत्याधुनिक पद्धतीच्या दहा बसेसचा समावेश असून, १० मिनी व ४० नियमित बसेस असतील. ज्या एजन्सीला ई-टेंडरिंग मिळाले आहे, त्यांच्याकडून या बसेस खरेदी होतील. बसेस चालविण्याच्या व्यवस्थापनासाठी पुन्हा टेंडर निघाल्यावर वाहतुकीसाठी सिटी बस सेवा सुरू होेणार आहे. या प्रक्रियेला आणखी किमान तीन ते चार महिने लागण्याची शक्यता मनपातीलच काही अधिकारी व्यक्त करतात. आॅटो चालकांची मनमानी गेल्या अनेक दिवसांपासून सिटी बसेस सुरू व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून शहर बस सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांना आता उत्सुकता लागली आहे. शहर बससेवा सुरू झाल्यावर आॅटो चालकांची सुरू असलेली मनमानी काहीअंशी कमी होणार आहे.