पाण्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक जलआंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:12 IST2017-08-10T00:12:08+5:302017-08-10T00:12:08+5:30
सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे

पाण्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक जलआंदोलनाच्या तयारीत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे. यंदा पावसाळ्यात बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे संकट गडद झाल्याने जनआंदोलनासाठी नागरिक एकवटले आहेत.
महानगरपालिकेत येण्यासाठी नागरिकांना पाणी, रस्ते, लाइट, ड्रेनेज या चार सुविधांचे गाजर दाखविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या काळात स्थानिक जलस्रोत आटले की, सरकारी यंत्रणा टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवत होती; परंतु आता पाणी...पाणी म्हणत नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात पाण्यासाठी नागरिकांचा सततचा संघर्ष सुरू होता, तर आज महानगरपालिकेत आल्यावर तो पुन्हा बळावला आहे. मनपाने टँकर पुरवठ्याच्या पाण्यावर लावलेला खर्च अन् टँकरच्या फेºयातही तफावत जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
सातारा-देवळाईत इतर जलस्रोतावरून पाणी लिफ्टिंग करून आणणे जेवढे जिकरीचे आहे, त्यापेक्षाही मनपाच्या जलवाहिनीला सातारा-देवळाई जोडणे सोयीचे ठरणार आहे. जलकुंभ उभारून जनतेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. टँकरच्या पाण्यावर जनतेची तहान भागत नाही. ३० दिवसांचे पैसे भरून घेतात अन् त्या तुलनेत किती ड्रम आणि किती दिवस पाणीपुरवठा करता, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गावाची भौगोलिक अवस्था पाहता येथील नागरिकांना शासकीय मदत मिळण्यास खूप विलंब लागतो, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या परदरी तलावातील पाणीसाठा या वर्षात थोडाफार वाढला आहे. त्या पाण्यातून स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो; परंतु उगाचच आमच्या तोंडचे पाणी पळवून तुमचाही घसा कोरडा आणि गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी पाहणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकालादेखील विरोध केला आणि पुढेही तो कायम असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
गावातून सातारा-देवळाईपर्यंत पाणी मनपाने जायकवाडीच्या जलवाहिनीतूनच द्यावे, अशी भूमिका सातारा-देवळाईच्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर नागरिकांचे जलआंदोलन उभे राहत आहे.