टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान
By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:20:59+5:302014-07-03T00:16:47+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड गत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत.

टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान
व्यंकटेश वैष्णव, बीड
गत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत. शिरूर कासार, धारूर, बीड तालुक्यातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यातच २ जुलै चा दिवस उजडला तरी देखील पाऊस पडत नसल्याने पाणी टंचाई च्या गावांमध्ये वाढ होत असून टँकर मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत जिल्हयात १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर टँकरची संख्या ४०० पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
जिल्हयातील केज व शिरूर कासार तालुक्यात पाण्याच्या टंचाईची तीव्रता जास्त आहे. आज नाही तर उद्या पाऊस पडेल या आशेवर जिल्हयातील ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करत नव्हते. मात्र ३ जुलै उजडला तरी पावसाचा पत्ता नसल्याने आता जमीनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खलावत असून सुरू असलेले बोअर, हातपंप अचानक बंद पडत आहेत.
वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव हे तालुके वगळता इतर आठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे. मंगळवारी दोन तालुक्यातील चार ते पाच गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये केज तालुक्यात दोन ते तीन तर शिरूर कासार तालुक्याती दोन गावांमध्ये मंगळवारी टँकर वाढविण्यात आले आहे. पाऊस लांबणीवर पडत असल्याने पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे.
१४६ गावे तर २११ वाड्यांवर
टंचाईचे सावट
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ विहीरी व २५७ बोअर अधिग्रहित केलेले असून जिल्ह्यात १४६ गावे तर २११ वाड्यावर १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्हयात बहुतांश गावांमध्ये अजूनही पाणी टंचाई तीव्र होऊ शकते. पाणी टंचाईची जास्त तीव्रता आष्टी, शिरूर कासार, धारूर व केज तालुक्यांमध्ये जाणवत आहे. यामुळे आता नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
सर्व स्त्रोत घेतले ताब्यात
जिल्हयातील ज्या-ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी साठा शिल्लक आहे. ते सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केलेले आहेत. भविष्यात पाऊस पडला नाही तर प्रशासन पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी तयार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.