जनावरांचे गोठे नियमांच्या कात्रीत
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:11:15+5:302014-06-14T01:20:23+5:30
वार्ताहर, कळंब/भूम शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जनावरांचे गोठे नियमांच्या कात्रीत
वार्ताहर, कळंब/भूम
शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याला जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु, प्रशासनाकडून मात्र या प्रस्तावांना नियमांची कात्री लावली जात असून, काही ठिकाणी प्रस्तावांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कळंब तालुक्यात ३ हजार १२५ तर भूम तालुक्यातील ४०७ प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
सहा महिन्यांपासून प्रतीक्षा
कळंब : तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ३१२५ गोठ्यांचे प्रस्ताव घेवून सहा महिने लोटले असून, अद्यापही प्रशासनाच्या लालफितीत हे प्रस्ताव धूळखात पडले आहेत़ प्रस्ताव मंजुरीकडे अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने लाभार्थी शेतकरी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत़
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा सर्व घटकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, गांडूळखत निर्मिती, कुक्कुटपालन शेड, नॅडपेखत निर्मिती, अमृतपाणी खड्डा आदी कामे हाती घेण्यात आली आहेत़ याच अनुषंगाने तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ३१२५ गोठ्यांचे प्रस्ताव सहा महिन्यापूर्वी घेण्यात आले़ मात्र, अद्यापही हे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात धूळखात पडले आहेत़ तसेच जलसंधारणाची कामे, शेततळी, माती नाला बांध, शोषखड्डे, दगडी पौळ, समतलचर खोदणे, भूमिगत बंधारे, नालासरळीकरण, विहिरी पुर्नभरण आदी कामाकडेही संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याचे दिसत आहे़
दरम्यान, सध्या विहिरीच्या ४७ कामावर ८०१ मजूर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ तर कृषी पालकतांत्रिक अधिकाऱ्याकडे रोहयोतील रस्ता कामाचे मुल्यांकन करण्याचे आदेश दिल्याने चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ (वार्ताहर)
४५ ग्रा.पं.चे प्रस्ताव
भूम : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘जनावरांसाठी निवारा’ या योजनेच्या माध्यमातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. तालुकाभरातून ४०७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, भूम पंचायत समितीने याबाबतीत कुठलाच निर्णय घेतलेला नाही. मागील पाच महिन्यांपासून संबंधित प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. पंचायत समितीच्या या कारभारावर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठ्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. एका ग्रामपंचायतीसाठी ५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जवळपास ४५ ग्रामपंचायतींनी ४०६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवून गोठा उभारणीचे कामही पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, पंचायत समितीच्या चालढकलपणामुळे हे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. यातील एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासन पावसाळा सुरू झाल्यानंतर मंजुरी देणार काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आलेले बहुतांश प्रस्ताव ६०:४० च्या निकषात बसत नसल्याचे सांगितले जाते.
(वार्ताहर)
प्रभारीमुळे कामे खोळंबली
कळंब पंचायत समितीत प्रभारी राज असून, एका वर्षात पाच अधिकाऱ्यांना प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता़ अनेक कामे खोळंबली आहेत़ शेतकऱ्यांच्या जनावरांचे गोठे कुक्कुटपालन शेडसह इतर कामेही खोळंबल्याचे उपसभापती लक्ष्मण आडसूळ यांनी सांगितले़
प्रक्रिया सुरू आहे
मग्रारोहयो योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभातील जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, शौचालय आदी कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे़ मंजुरीनंतर ही कामे लवकरच हाती घेण्यात येतील, असे कळंब पंसचे प्रभारी गटविकास अधिकारी के़एस़यमपुरे यांनी सांगितले़
एकेका ठिकाणाहून पंचवीसवर प्रस्ताव
प्रत्येक ग्रामपंचायतीकडून पाच प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्रत्यक्षात एकेका ग्रामपंचायतीने २५ प्रस्ताव दाखल केले आहेत. ही अट शिथिल करून जास्तीत जास्त प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.