‘कॅन्सर’- महिलांनी जागरूक होणे आवश्यक
By Admin | Updated: October 13, 2016 01:06 IST2016-10-13T00:35:21+5:302016-10-13T01:06:15+5:30
ऋचिका पालोदकर , औरंगाबाद ‘कॅन्सर’ हा शब्द ऐकताच प्रत्येकाला धडकी भरते. प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्त असणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी. रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा आजार.

‘कॅन्सर’- महिलांनी जागरूक होणे आवश्यक
ऋचिका पालोदकर , औरंगाबाद
‘कॅन्सर’ हा शब्द ऐकताच प्रत्येकाला धडकी भरते. प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्त असणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी. रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा आजार. मात्र, आज उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधांच्या जोरावर या आजारातून पूर्णपणे बाहेर पडता येते हेही तेवढेच खरे आहे. आॅक्टोबर महिना हा ‘स्तन कॅन्सर जनजागृती महिना’ म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने या विषयातील जाणकार महिला तसेच डॉक्टरांशी चर्चा करून त्यांची जाणून घेतलेली ही मते.
काही वर्षांपूर्वी भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी आढळून येत होते. गर्भाशयाचा किंवा ‘सर्व्हिक्स’च्या कर्करोगाचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये अधिक दिसून यायचे. परंतु आता भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार १ लाख ४४ हजार ९३७ भारतीय महिलांना स्तनांचा कर्करोग झाला होता. त्यापैकी ७० हजार २१८ महिलांचा मृत्यू झाला. यावरून असे लक्षात येते की, कर्करोगाने ग्रस्त दर दोन स्त्रियांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
या आजाराचे प्रमाण पाहता महिलांमध्ये याविषयी जागरूकता येणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर न झाल्यामुळे किंवा महिला त्यांच्या प्रकृतीबाबत जागरूक नसल्यामुळे मृत्यूदराचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु दर महिन्याला घरच्या घरी महिलांनी काही तपासण्या केल्यास रोगाचे निदान लवकर होऊन महिला या आजारातून पूर्णपणे बाहेर पडू शकतात.