रेशनच्या तांदळाची २९ रुपयांनी खरेदी
By Admin | Updated: May 22, 2014 00:14 IST2014-05-21T23:46:36+5:302014-05-22T00:14:25+5:30
उस्मानाबाद : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी दोन महिन्यानंतर ५८३ मेट्रीक टन तांदूळ मंज़ूर झाला आहे.

रेशनच्या तांदळाची २९ रुपयांनी खरेदी
उस्मानाबाद : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी दोन महिन्यानंतर ५८३ मेट्रीक टन तांदूळ मंज़ूर झाला आहे. हा तांदूळ प्रशासनाच्या वतीने २९ रुपयाने खरेदी करण्यात येणार असून तो रेशन दुकानावर ९ रूपये साठ पैसे दराने लाभधारकांना दिला जाणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. जिल्ह्यातील ११ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यांच्यासाठी प्रतिमहा ८२१९.४८५ मेट्रिक टन इतके धान्य लागते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो प्रमाणे गहू, ३ रुपयांप्रमाणे तांदूळ तर १ रूपयांप्रमाणे भरडधान्य वितरित केले जात आहे. मात्र एपीएल धारकांना गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाकडून धान्य पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८८६ लाभार्थी शिधापत्रिका धारकांना धान्याची टंचाई जाणवत होती. या लाभार्थ्यांना जवळपास तीन महिन्यापासून रेशनचे धान्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना महागडे अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, शासनाने आता २९ हजार ८१० मे.टन तांदूळ खरेदी करुन तो एपीएल शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानावरुन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात ९ रूपये ६० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड ५ किलो या प्रमाणे याचे वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)