आॅनलाईन धान्य खरेदीचा व्यापाऱ्यांत संभ्रम
By Admin | Updated: December 16, 2014 01:08 IST2014-12-16T00:54:51+5:302014-12-16T01:08:38+5:30
औरंगाबाद : पुढील पंधरवड्यात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन धान्य खरेदी सुरू करण्यात येणार आहे,

आॅनलाईन धान्य खरेदीचा व्यापाऱ्यांत संभ्रम
औरंगाबाद : पुढील पंधरवड्यात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन धान्य खरेदी सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा नुकतीच पुणे येथील पणन मंडळाचे संचालक सुभाष माने यांनी केली; मात्र या संदर्भातील कोणतेच आदेश येथील बाजार समित्यांना अजूनही प्राप्त झाले नाहीत, आणि आॅनलाईन विक्रीसंदर्भात व्यापाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण दिले नाही, यामुळे ई-ट्रेडिंगच्या अंमलबजावणीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या बाजार समित्यांमध्ये अडत्यांच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री केली जाते. शेतकरी बाजार समितीमध्ये धान्य आणतात. त्यानंतर अडते हर्राशी करून ते धान्य जास्त बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यास विकतात. त्यानंतर अडते शेतकऱ्यास विकलेल्या मालाची रक्कम देतात. मात्र, येत्या काळात धान्य खरेदीचे व्यवहार आॅनलाईन होणार आहेत. यात प्रत्येक धान्याचे पाच ते सात प्लांट बनविण्यात येतील, त्याला बाजार समितीचे अधिकारी गुणवत्तानिहाय दर्जा देऊन ग्रेड तयार करतील. गुणवत्ता ठरल्यानंतर व्यापाऱ्यांना आॅनलाईन भाव कोड करावा लागेल. दुपारी १ वाजून १ मिनिटांनी ज्या व्यापाऱ्यांचे भाव अधिक आहेत त्यांना हे धान्य विकण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. आॅनलाईन धान्य खरेदीसंदर्भात मागील वर्षी राज्यातील ४ हजार अडते व व्यापाऱ्यांना पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले. यात जाधववाडीतील एकाही अडत्याला व व्यापाऱ्याला प्रशिक्षण देण्यात आले नाही.
आॅनलाईन विक्रीसंदर्भात काही व्यापाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य बहुतांश व्यापाऱ्यांना माहिती नाही. अशा व्यापाऱ्यांनी आॅनलाईन धान्य खरेदी-विक्री कशी करावी, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. संभ्रमाची परिस्थिती आहे. या संदर्भात अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरीश पवार यांनी सांगितले की, कोणतीही पूर्वसूचना नाही, व्यापाऱ्यांना प्रशिक्षण नाही, असे अचानक पंधरा दिवसात आॅनलाईन ट्रेडिंग कशी सुरू करणार? आॅनलाईन ट्रेडिंग सुरू केले तरीही यात शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. आता हर्राशी झाल्यावर थोड्याच वेळात शेतकऱ्याच्या हातात रोख रक्कम मिळते;मात्र आॅनलाईन ट्रेडिंगमध्ये आधी बँक खात्यात रक्कम जमा होईल, मग ती शेतकऱ्यास मिळेल. शेतकरी नानासाहेब पळसकर म्हणाले की, शेतकऱ्यांना आॅनलाईन ट्रेडिंगचे प्रशिक्षण मिळावे, कारण आॅनलाईन व्यवहारात काय भाव मिळाला हे कळाले पाहिजे. मुळात खरेदी-विक्री आॅनलाईन असो वा सध्या अस्तित्वात असलेली पद्धत, शेतकऱ्यास योग्य भाव व त्वरित पैसे मिळावेत, हीच अपेक्षा.
हर्राशी झाल्यावर थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या हातात रोख रक्कम मिळते;मात्र आॅनलाईन ट्रेडिंगमध्ये आधी बँक खात्यात रक्कम जमा होईल, मग ती शेतकऱ्यास मिळेल. शेतकऱ्यांना आॅनलाईन ट्रेडिंगचे प्रशिक्षण मिळावे, कारण आॅनलाईन व्यवहारात काय भाव मिळाला हे कळाले पाहिजे.