ब्रह्मवृंद मनपाच्या आखाड्यात उतरणार
By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:08:33+5:302014-12-11T00:46:05+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ब्राह्मण महासंघाने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

ब्रह्मवृंद मनपाच्या आखाड्यात उतरणार
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ब्राह्मण महासंघाने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नसून जो पक्ष ब्राह्मण उमेदवारांना तिकीट देईल, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी महासंघाने घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी समाजातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घराबाहेर पडावे, असे आवाहन आज करण्यात आले.
अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने बुधवारी प्रख्यात विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘ब्राह्मण समाजापुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. मंत्र्यांचे पीए किंवा पक्षाचे प्रवक्ते होण्याऐवजी निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी बना, असे आवाहन या व्यासपीठावरून करण्यात आले. यावेळी महासंघाने मनपा निवडणुकीसाठी विविध पक्षांतर्फे निवडणूक लढविणाऱ्या २१ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात चार महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे. औरंगाबाद शहरात सुमारे साडेतीन लाख ब्राह्मण आहेत. ४० वार्डांत ब्राह्मणांची संख्या अधिक आहे. आता परंपरागत राजकीय पक्षाने ब्राह्मण समाज आपणास मत देईल या भ्रमात राहू नये. जो पक्ष ब्राह्मण उमेदवाराला तिकीट देईल, त्यास महासंघ पाठिंबा देईल, अशी घोेषणा अध्यक्ष अनिल मुळे यांनी केली. व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, शहराध्यक्ष डॉ. संतोष सवाई, महिला अध्यक्षा अश्विनी जोशी, युवा जिल्हाध्यक्ष पंकज पाठक यांची उपस्थिती होती.