मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार
By उदयकुमार जैन | Updated: June 6, 2025 12:57 IST2025-06-06T12:56:41+5:302025-06-06T12:57:26+5:30
पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्धपातळीवर हालचाली

मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार
उदयकुमार जैन, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: आग्या मोहळच्या माश्यांना परफ्यूम अर्थात अत्तराच्या काही विशिष्ट फ्लेवर्सचे आकर्षण असते. शिवाय विडी-सिगारेटचा धूर, गोंगाट या कारणातूनही माश्या पर्यटकांवर हल्ले करतात. तीन दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही तेच घडले. असे हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांमधील आग्या मोहळचे पोळे जवळच जंगलात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे वाचेल, शिवाय पर्यटकांवरील हल्लेदेखील थांबतील.
अजिंठा लेणीत मंगळवारी आग्या मोहळच्या माश्यांनी पुण्यातील ५० पर्यटकांवर हल्ला केला. गेल्या ४ महिन्यांत ८०० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. पुरातत्व विभाग आणि वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेणीत ८ ते १० पोळे आहेत. वारंवार हल्ले करणारे तीन पोळे जवळच स्थलांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घतेली, अशी माहिती प्रादेशिक उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी दिली.
प्रथमोपचाराचीही सुविधा नाही
हल्ला करणाऱ्या मधमाश्या या आग्या मोहळाच्या असल्याने त्याच्या वेदना जीवघेण्या असतात. अशा वेळी अजिंठा लेण्यांत प्रथमोपचारांचीही सुविधा नाही. रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागतात.
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?
विशिष्ट परफ्यूम, रंगीबेरंगी कपडे याकडे कीटक, वन्यजीव व मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात किंवा लेण्यांसारख्या ठिकाणी जाताना परफ्यूम, असे कपडे वापरू नयेत. वन्यजीवांना गोंगाट आवडत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शांतता बाळगावी. विडी-सिगारेटच्या धुरामुळेदेखील मधमाश्या आक्रमक होऊ शकतात. हे सोबत नेणे टाळावे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ किशोर पाठक यांनी दिला.
व्यावसायिक आर्थिक संकटात
शेकडो वर्षांपासून ही समस्या आहे. बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवर यावर उपाय केला जायचा. परंतु आता कायदा, नियमांचा बाऊ करून याकडे दुर्लक्ष होत आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे वाईट संदेश जात आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी व्हायला नको. स्थानिक व्यावसायिक यामुळे धास्तावले आहेत, असे अजिंठा लेणी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पपिंद्रपालसिंग वाय. टी. यांनी सांगितले.
शिवनेरी किल्ल्यावरही अशीच समस्या होती, तेथे ज्या रेस्क्यू टीमने काम केले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. लवकरच ही टीम मधमाश्यांना कुठलीही हानी न पोहोचवता पोळे स्थलांतरित करणार आहेत.
-संतोष ठोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी
अजिंठा प्रमाणेच वेरूळ, पितळखोरा, नाशिकच्या पांडव लेण्यांसह आमच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व लेण्यांत हीच समस्या आहे. त्यामुळे येथेही आग्या मोहळ पोळ जवळच्या जंगलात स्थलांतरित केले जाईल.
-मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग