अटीतटीच्या लढतीत ‘उत्कर्ष’ची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:25 IST2018-06-16T00:25:02+5:302018-06-16T00:25:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रणीत उत्कर्ष पॅनलची सरशी झाली.

अटीतटीच्या लढतीत ‘उत्कर्ष’ची सरशी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान झाले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण प्रणीत उत्कर्ष पॅनलची सरशी झाली. भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचला दोन जागांवर समाधान मानावे लागले. इतर प्राधिकरणांच्या नेमणुकींवरही उत्कर्षचेच वर्चस्व राहिले.
विद्यापीठाच्या अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर राखीव प्रवर्गातील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. चार जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात अधिसभेचे सदस्य असलेले आमदार अमरसिंह पंडित, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. अतुल सावे यांच्यासह विविध प्रवर्ग, राज्यपाल, कुलगुरू नियुक्त सदस्यांसह प्रभारी अधिकाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. एकूण ६९ जणांनी मतदान केले.
प्राचार्य गटात उत्कर्षचे डॉ.जयसिंग देशमुख यांना पहिल्या फेरीत ३४, मंचचे डॉ. टकले यांना ३० आणि डॉ. प्राप्ती देशमुख यांना ५ मते पडली. यात कोणीही कोटा पूर्ण केला नसल्यामुळे डॉ. देशमुख यांची दुसºया पसंतीची मते मोजली. यातील तीन मते डॉ. जयसिंग देशमुख यांना मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले. प्राध्यापक गटात उत्कर्षचे डॉ. राजेश करपे यांनी ३५ तर मंचचे डॉ. गोविंद काळे यांना ३४ मते मिळाली. डॉ. करपे यांना अवघ्या एका मताने विजय मिळाला
. पदवीधर गटात उत्कर्षचे उमेदवार डॉ. नरेंद्र काळे यांना ३९ मते पडली. तर बंडखोरी केलेले डॉ. संभाजी भोसले यांना ३० मते मिळाली. संस्थाचालक गटात मंच पुरस्कृत उमेदवार संजय निंबाळकर यांना ३७, उत्क र्षचे कपिल आकात यांना २४ आणि अपक्ष भाऊसाहेब राजळे यांना ८ मते मिळाली. यात निंबाळकर यांनी विजयी मताचा कोटा पूर्ण केला. या मतदानानंतर उत्कर्षच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
व्यवस्थापनसह इतर समित्यांवरील विजयी उमेदवार
व्यवस्थापन परिषदेचे विजयी उमेदवार उत्कर्षचे डॉ. राजेश करपे, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के आणि सचिन निकम यांचा समावेश आहे. तर मंचकडे पुरस्कृत संजय निंबाळकर, डॉ. हरिदास विधाते यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांना कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय स्थायी समितीवर उत्कर्षचे डॉ. भारत खंदारे, डॉ. सतीश दांडगे आणि शेख जहूर यांची बिनविरोध निवड झाली. विद्यापरिषदेवर गोविंद देशमुख, तक्रार निवारण समितीवर डॉ. भगवानसिंग डोभाळ आणि सुनंदा सरवदे यांची निवड केली.
कुलसचिवांवर निलंबनाची कारवाई
अधिसभेच्या बैठकीला सुरुवात होताच कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे महाराज असा उल्लेख केला. या शब्दावर प्रा. सुनील मगरे यांनी आक्षेप घेऊन बाबासाहेबांना देव, राजा बनविण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. यामुळे कुलसचिवांना निलंबित करण्याची आक्रमकपणे मागणी केली. यावर प्रचंड गदारोळ झाला. शेवटी कुलगुरूंनी डॉ. पांडे यांना निलंबित करण्याची घोषणा करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. मतदानाच्या वेळी मंचच्या सदस्यांनी डॉ. पांडे यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी लावून धरली. तेव्हा ती मान्य झाल्यामुळे डॉ. पांडे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. तसेच दुपारच्या सत्रानंतर कामकाजात सहभागही नोंदविला.
हा सत्याचा विजय
विद्यापीठ कायद्याचा भंग करीत कुलगुरूंनी प्रभारी अधिकाºयांना मतदानाचा अधिकार दिला. राज्य सरकारने नको तेवढा हस्तक्षेप करीत मतदारांवर दबाव टाकला. तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा विजय सत्याचा आहे.
- आ. सतीश चव्हाण,
उत्कर्ष पॅनलप्रमुख
एकमेव सदस्य
राज्यात १९७४, १९९४ आणि २०१६ या विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी मिळणारा एकमेव सदस्य आहे. हा इतिहास घडला आहे. विद्यापीठ विकास मंचने पुरस्कृत केल्यामुळे विजयास हातभार लागला. त्याच वेळी उत्कर्षच्या गटातीलही काही सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे बहुमत मिळाले.
- संजय निंबाळकर, विजयी उमेदवार