बँकेची सोसायटीकडून सावकारी वसुली !
By Admin | Updated: December 12, 2014 00:53 IST2014-12-12T00:44:49+5:302014-12-12T00:53:40+5:30
विठ्ठल कटके ,रेणापूर राष्ट्रीयकृत बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रेणापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीस पीक कर्जाचे व्याज ६ टक्क्यांऐवजी १०़२५ टक्के भरावे लागल्याने

बँकेची सोसायटीकडून सावकारी वसुली !
विठ्ठल कटके ,रेणापूर
राष्ट्रीयकृत बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रेणापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीस पीक कर्जाचे व्याज ६ टक्क्यांऐवजी १०़२५ टक्के भरावे लागल्याने सोसायटीला दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे़ दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेने दिलासा देण्याऐवजी सावकारी वसुलीच राबविली आहे़ त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
रेणापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्ह्यात सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते़ या सोसायटीचे जवळपास ५ हजार ५०० शेतकरी सभासद आहेत़ गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रल बँकेच्या येथील शाखेतून सोसायटीला कर्जपुरवठा होतो़ त्यामुळे दरवर्षी कर्जदार हे जुनअखेर कर्जाचा भरणा करुन नव्याने कर्ज घेत असतात़
सन २०१३-१४ या वर्षात या बँकेमार्फत संस्थेच्या १ हजार ३८५ शेतकरी सभासदांना ४ कोटी ९७ लाख १९७ रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले़ फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार २५२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा केला नाही़ त्यामुळे ते थकबाकीदार झाले़ या थकबाकीदारांकडे ३ कोटी २४ लाख ८२ हजार ९२९ रुपयांची थकबाकी आहे़ दरवर्षी सोसायटी बँकेकडे जुने कर्ज व त्यावरील व्याज जमा करते़ जूनअखेरीस शेतकरी पीककर्जाचा भरणा करीत असताना ६ टक्के व्याजही भरतात़ परंतु, सोसायटी बँकेकडे कर्जाचा भरणा करीत असताना तो १०़२५ टक्के दराने करावा लागत आहे़ व्याजाच्या दराच्या घोळामुळे गेल्या दोन वर्षांपासून सोसायटीला १ कोटी ५० लाख रुपये अतिरिक्त भरावे लागले आहेत़ त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे़
केंद्र व राज्य शासनाने पीक कर्जाच्या व्याजास सवलत दिली आहे़ परंतु, बँकाकडून ज्यादा व्याज आकारणी कशी काय केली जाते असा सवाल निर्माण होत आहे़ शेतीसाठी १ लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्क्याने, ३ लाखांपर्यंतचे कर्ज २ टक्क्यानुसार असल्याचे सांगण्यात येते़ परंतु, बँकाकडून ज्यादा वसुली केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़४
बँकेकडून ज्यादा व्याजदर लावण्यात येत असल्याने रेणापूर सोसायटीतील सभासदांची थकबाकी वाढली आहे़ त्यामुळे आज घडीला ३ कोटी २४ लाख ८२ हजार ९२९ रुपये अशी थकबाकी झाली आहे़ बँकेच्या धोरणात शेतकरी भरडला जात आहे़
४रेणापूर येथील सोसायटीकडून सेंट्रल बँकेने आजपर्यंत पीककर्जापोटीचे व्याज हे १०़२५ टक्क्याने वसूल केले आहे़ त्यामुळे व्याजापोटी दीड कोटी रुपये सोसायटीस बँकेकडे भरावे लागले आहे़ ही रक्कम परत मिळावी़ तसेच अशा प्रकारची व्याज आकारणी बंद करावी, या मागणीसाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे अनेकदा निवेदने देण्याबरोबरच वारंवार पत्रव्यवहारही केला आहे़ मात्र, त्याची कसलीच दखल घेतली गेली नसल्याचे सोसायटीचे चेअरमन मतीन सय्यद, व्हाईस चेअरमन सतीश पवार, सचिव किसन क्षीरसागर यांनी सांगितले़
४रेणापूरच्या सोसायटीस आम्ही कर्ज देत असलो तरी प्रत्यक्षात आमच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात नाही़ आरबीआयच्या २०१२ या आदेशानुसार संस्थेला पीएसीएसनुसार १०़२५ टक्के व्याजाची आकारणी केली जाते़ व्याज दराबाबत संस्थेकडून आमच्या कार्यालयाकडे तक्रारी आल्या असून त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू असल्याचे येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक विशाल कुमार यांनी सांगितले़