औरंगाबादकरांना मुबलक पाणी मिळण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:39+5:302020-12-17T04:27:39+5:30
आता पाणी मिळण्याची शक्यता समांतर जलवाहिनी हा प्रकल्प चांगला होता. महापालिकेला आणि संबंधित कंपनीला प्रकल्प राबविता आला नाही. आता ...

औरंगाबादकरांना मुबलक पाणी मिळण्याची अपेक्षा
आता पाणी मिळण्याची शक्यता
समांतर जलवाहिनी हा प्रकल्प चांगला होता. महापालिकेला आणि संबंधित कंपनीला प्रकल्प राबविता आला नाही. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्यामुळे शहरात तीन वर्षांनंतर निश्चितच मोठ्या प्रमाणात पाणी येईल. सर्वसामान्य नागरिकांची दररोज तहान भागेल. महापालिकेने राज्यातील इतर शहरांप्रमाणे पाणीपट्टी ठेवावी.
जगदीश ढाकणे, गजानन कॉलनी, गारखेडा.
पाण्याशिवाय शहराचा विकास अशक्य
१९८० च्या दशकात आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ख्याती होती. तेव्हा येथे मुबलक प्रमाणात पाणी आणि कमी लोकसंख्या होती. आता नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात मुबलक प्रमाणात पाणी आल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी या प्रक्रियेला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. प्रत्येक गरीब व्यक्तीला पाणी आठ दिवसांकरिता साठवून ठेवता येत नाही.
मोहम्मद बिलाल, बुढीलेन.
उद्योगधंदे वाढतील
शहरात पाणी नसल्यामुळे मोठ-मोठे उद्योग येण्यास तयार नव्हते. आता शाश्वत पाणी येणार असल्याने उद्योगधंदे येतील. शहराच्या आसपास असलेल्या नवीन वसाहतींना पाणी मिळेल. उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेली योजना शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. प्रत्येक नागरिकाला दररोज पाणी मिळावे हीच रास्त अपेक्षा.
पवन अधाने पाटील, हडको.