औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गामुळे शेती, उद्योगाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST2021-03-01T04:02:57+5:302021-03-01T04:02:57+5:30

जयेश निरपळ गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ ...

Aurangabad-Nagar railway line will give a boost to agriculture and industry | औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गामुळे शेती, उद्योगाला मिळेल चालना

औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गामुळे शेती, उद्योगाला मिळेल चालना

जयेश निरपळ

गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ मार्च दरम्यान होणार आहे. या मार्गात गंगापूरचा समावेश असून, तालुक्यातील शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा केला जात होता.

प्रस्तावित रेल्वेमार्गावर फक्त औरंगाबादवरून पुणेला जाणाऱ्या प्रवाशांनाच फायदा होणार नाही, तर या मार्गावरील आधुनिक शेती, उद्योगांना याचा मोठा फायदा होईल. आजघडीला दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी व खर्चिक साधनांमुळे शेतीमाल काही मर्यादेपर्यंत राहिला आहे. औरंगाबाद-अहमदनगर हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास शेतीमालाला परराज्यांतील मोठ्या बाजारपेठांचा पर्याय अगदी कमी खर्चात उपलब्ध होईल.

वाळूज परिसरातील उद्योगधंद्यांना देखील याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतूक बंगलोर, कोलकाता यासारख्या शहरांतून करणे जलद होईल. स्थानिक व्यापाऱ्यांची देखील व्यापारी शहरांंशी कनेक्टिव्हिटी वाढून मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मध्य रेल्वेमार्फत तालुका थेट दक्षिण व पूर्व रेल्वेस जोडणे सहज शक्य होईल.

शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना आपल्या मालाची मालवाहतूक करणे सोयीस्कर होणार आहे. रेल्वेला मुख्य उत्पन्न हे मालवाहतुकीतूनच मिळत असल्याने भारतीय रेल्वेला देखील याचा फायदा होईल. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल. त्यामुळे हे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

------------------

आमच्या डाळींब, कांदा व पपईला परराज्यांत मोठी मागणी आहे; परंतु इतर वाहनाने ते पाठविणे परवडत नाही. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना परराज्यांत मोठ्या प्रमाणात सामूहिक माल पाठविता येईल. - डॉ. उद्धवराजे काळे पाटील, उद्योजक तथा शेतकरी

स्थानिक बाजारपेठेतून जादा दराने खरेदी करावे लागणारे पॅलेट इंधन हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास आम्हाला परराज्यांतून स्वस्तात व थेट आयात करणे सोईस्कर होईल. - विशाल गायकवाड, उद्योजक.

इतर शहरांतून माल वाहतूक करताना मालाची खूप चढ-उतार होते. यामध्ये नुकसान तर होतेच, शिवाय वेळ व पैसा जास्त जातो. या मार्गामुळे आम्हाला हे सर्व नुकसान टाळता येईल. - प्रवीण पारख, व्यापारी.

Web Title: Aurangabad-Nagar railway line will give a boost to agriculture and industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.