उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले
By Admin | Updated: May 18, 2014 00:38 IST2014-05-18T00:32:57+5:302014-05-18T00:38:49+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे.

उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले
विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. शेतकर्यांमध्ये कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने आतापासूनच चिंता वाढू लागली आहे. पाथरी तालुका हा सिंचनाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी पात्रातील बंधारे या भागातील शेतकर्यांचा कल ऊस लागवडीकडे आहे. मागील काही वर्षात ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस गाळपासाठी नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. तरी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. गतवर्षी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नाही. लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याने जेमतेम गाळप केले. गतवर्षी या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी बाहेरी कारखान्यांनी नेला. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्यांनी महागडी उसाची बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली आहे. दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रात ५ लाख मे.टना पेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करू शकले तरी या भागात ऊस शिल्लक राहणार आहे. यामुळे कारखाने यावर्षी वेळेच्या आत सुरू होणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच या भागातील शेतकरी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनातील वाद वेळेच्या आत मिटवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे. बाहेरील कारखाने कानाडोळा करणार गतवर्षी जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर उसाचे क्षेत्र कमी होते. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांनी या भागातील शेतकर्यांचा ऊस गाळपास नेला आहे. यावर्षी सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बाहेरील कारखाने या भागातील शेतकर्यांकडे कानाडोळा करणार असल्याचे दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या कारखान्यांनी आपला ऊस गाळपास न्यावा, अशी भावना या भागातील शेतकरी ठेऊन आहे. तालुक्यात बहुतांश उसाचे क्षेत्र १० ते १५ कि.मी.च्या आत आहे.यामुळे या भागातील ऊस बैलगाडी कार्यक्षेत्रातील आहे. रेणुका शुगर कारखान्याला गाळपासाठी वाहनाऐवजी बैलगाडीची यंत्रणा लागत असल्याने उसाची वाहतूकही कमी खर्चात होते. आणि शेतकर्यांचा उसही वेळेच्या आत जातो. यामुळे रेणुका शुगर कारखाना सुर होणे शेतकर्यांच्या हिताचे आहे आणि आतापासून शेतकर्यांचा रेटा कारखाना सुरू होण्यासाठी वाढू लागला आहे.