... आणि घडला लडाखी व मराठीचा स्नेहमेळ!
By Admin | Updated: December 28, 2014 01:24 IST2014-12-28T01:24:03+5:302014-12-28T01:24:34+5:30
औरंगाबाद : लेह ते औरंगाबाद असा हजारो मैलांचा प्रवास करून पर्यटनासाठी आलेल्या लडाखी मुला-मुलींच्या असंख्य प्रश्नांना शनिवारी उत्तरे मिळाली.

... आणि घडला लडाखी व मराठीचा स्नेहमेळ!
औरंगाबाद : वृत्तपत्र कसे निघते? ते कुठे छापले जाते? पत्रकार बातम्या कशा मिळवतात? लेह ते औरंगाबाद असा हजारो मैलांचा प्रवास करून पर्यटनासाठी आलेल्या लडाखी मुला-मुलींच्या असंख्य प्रश्नांना शनिवारी उत्तरे मिळाली.
गोऱ्या-गुलाबी चेहऱ्यावरचे अपार कुतूहल, निरागस बोलके डोळे आणि जग समजावून घेण्याची उमेद हाताशी घेऊन आलेल्या या भारतीय जवानांच्या पाल्यांनी शनिवारी ‘लोकमत’ ला सदिच्छा भेट दिली.
औरंगाबादच्या कॅन्टोनमेंटतर्फे ही स्नेहभेट घडवण्यात आली. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, प्रख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले, मेजर अजितकुमार, लेफ्टनंट कर्नल अमन गिल व त्यांचे कुटुंबिय, प्रोझोन मॉलचे संचालक अनिल इरावणे उपस्थित होते. दर्डा यांनी मुलांना कार्यालयातील विविध विभागांची कार्यपद्धती समजावून दिली. वृत्तपत्र प्रकाशित होण्याआधी ते कोणत्या टप्प्यामधून जाते याची सविस्तर माहिती देत त्यांच्याशी मुक्तसंवाद केला.
लेह येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील ३० मुले देशभरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी आली आहेत. भारतीय लष्कराने ‘मिशन सद्भावना’ अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला
आहे.
आज या मुलांच्या भेटीत ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी पुढाकार घेतला. यात महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना भेटी दिल्यानंतर या मुलांनी मॉलमधला झगमगाट, वाहनांची वर्दळ आणि उंचच उंच इमारती पहिल्यांदाच पाहिल्या. हा अनुभव कसा होता या प्रश्नावर नवव्या इयत्तेमध्ये शिकणारी जिग्नेट नॉरझिन म्हणाली, ‘इतक्या मोठ्या, दिव्यांनी चमचमणारे शहर पाहून मी हरवून गेले. मात्र, इथल्या घाईगर्दीपेक्षा मला आमचा निसर्गरम्य शांत, सौम्य लेह जास्त आवडतो.’ स्टॅन्झिनला खूप शिकून डॉक्टर व्हायचे आहे. ती म्हणते,‘मला माझे गाव खूप आवडते; पण इकडल्यासारखे उच्चशिक्षण घेण्याच्या सुविधा आमच्याकडे नाहीत. इकडे येऊन मी शिकेन.’ पण डॉक्टर झाल्यावर परत लेहला जाऊन तेथील लोकांची सेवा करणार हे सांगायला ती विसरत नाही! या मुलांचे शिक्षक कॅप्टन जिग्मेट सिनगे व तेत्सान अँगमो यांनी लेहमधली जीवनशैली, जनजीवन याबाबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही सगळे राहतो त्या भागाची उंची आहे किमान अकरा हजार फूट! वर्षातील सहा महिने उणे तीस अंशांपर्यंत जाणारी भयानक थंडी आणि बर्फवृष्टी, उरलेले सहा महिने सूर्यप्रकाश अशा वातावरणात आम्ही राहतो. तुमच्याकडचे हे हिवाळ्याचे तापमान आमच्याकडे अगदीच सामान्य समजले जाते.