विधानसभेनंतर मसापच्या निवडणुका
By Admin | Updated: June 30, 2014 01:04 IST2014-06-30T00:43:20+5:302014-06-30T01:04:03+5:30
औरंगाबाद : दि. ३० आॅक्टोबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या कालावधीत(मसाप) कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानसभेनंतर मसापच्या निवडणुका
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकानंतर दि. ३० आॅक्टोबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या कालावधीत मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यमान कार्यकारिणीची मुदत मार्च २०१२ मध्येच संपलेली असून, तब्बल दोन वर्षांच्या विलंबानंतर या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
मसापच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी नांदापूरकर सभागृहात झाली. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले अध्यक्षस्थानी होते.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कार्यकारिणी सदस्य डॉ. जगदीश कदम यांनी दिली. बैठकीला मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, कुंडलिक अतकरे, डॉ. दादा गोरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, भारत सासणे, प्रा. ललिता गादगे, कार्यकारिणी सदस्य, केशव सखाराम देशमुख, देवीदास कुलकर्णी, प्रा. विलास वैद्य, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम
मतदार यादी जाहीर - दि. ३१ आॅगस्ट २०१४
आक्षेप नोंदणी - दि. १६ सप्टेंबर २०१४
आक्षेपांवर सुनावणी व निर्णय - दि. १ आॅक्टोबर २०१४
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी - दि. १६ आॅक्टोबर २०१४
निवडणूक घोषणा व नामनिर्देशनपत्र वाटप सुरू - दि. ३० आॅक्टोबर २०१४
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा अंतिम दिनांक - दि.१० नोव्हेंबर २०१४
नामनिर्देशनपत्राची छाननी व पात्र उमेदवारांची यादी घोषित- १३ नोव्हेंबर
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख - दि.२१ नोव्हेंबर २०१४
पात्र उमेदवारांची यादी जाहीर- दि.२२ नोव्हेंबर २०१४
मतदान पत्रिका मतदारांना पाठविणे - दि.५ डिसेंबर २०१४
मतपत्रिका मतपेटीत टाकणे अंतिम तारीख - १५ जानेवारी २०१५
मतमोजणी - दि. १६ जानेवारी २०१५
आताही चालढकल होतेय
मराठवाडाभर पसरलेल्या पावणेचार लाख मतदारांची पदवीधर निवडणुकीची सर्व प्रक्रिया दीड महिन्यात संपली. मसापच्या निव्वळ अडीच हजार मतदारांसाठी सहा महिन्यांची प्रक्रिया घोषित करणे अनाकलनीय आहे. मार्च २०१२ मध्येच विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपला . त्यामुळे एप्रिल २०१२ मध्येच नवीन कार्यकारिणी येणे अपेक्षित होते. परंतु नियमात बदल करण्याचे कारण दाखवून निवडणुका लांबविल्या. आताही चालढकल होतेय.
-श्रीकांत उमरीकर, आजीव सभासद