२८ नंतर ८४ आता १२५ दिवसांनंतरही लस नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST2021-07-29T04:05:56+5:302021-07-29T04:05:56+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा, हा निकष केंद्र शासनाने लसींचा तुटवडा ...

२८ नंतर ८४ आता १२५ दिवसांनंतरही लस नाही!
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा, हा निकष केंद्र शासनाने लसींचा तुटवडा जाणवताच थेट ८४ दिवसांवर नेला. आता १२५ दिवस उलटले तरी हजारो नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही. दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करणाऱ्या शहरातील नागरिकांची यादी थेट एक लाखावर गेली आहे.
जिल्ह्यात आठ लाख ११ हजार ४८ नागरिकांनी पहिला, तर दोन लाख ८९ हजार ३०० जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरण सुरू केल्यावर केंद्र शासनानेच दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यावा, असे जाहीर केले. लसींचा तुटवडा जाणवताच दुसरा डोस थेट ८४ दिवसांवर नेण्यात आला. आता नागरिकांचे १२५ दिवस उलटले तरी लस मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात व ग्रामीण भागातही परिस्थिती अशीच आहे.
मोबाइलवर मेसेज येतो; पण...
८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्यासाठी केंद्र शासनाचा नागरिकांना मोबाइलवर मेसेज तर येतो; पण लसच मिळत नाही. कालावधी संपून चार ते सहा आठवडे उलटले तरी अनेकांना लस मिळत नाही. आरोग्य यंत्रणा लस येईल एवढेच सांगत आहे. आलेली लस कधी संपते हे कळतही नाही.
विदेशात जाणाऱ्यांना २८ दिवसांत दुसरा डोस
विदेशात जाणाऱ्या नागरिकांना आजही केंद्र शासन २८ दिवसांनंतरच दुसरा डोस उपलब्ध करून देत आहे. विदेशात ८४ दिवसांनंतर दुसरा डोस चालत नाही. अनेक देशांनी २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा हा दंडक केला आहे. शिवाय तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून बूस्टर डोस देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर ॲण्टिबॉडीज किती दिवस टिकतात हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. विदेशात अनेक ठिकाणी बूस्टर डोस सुरू झालाय, ही वस्तुस्थिती आहे. शासनाने जे निकष ठरवून दिले त्यानुसार काम सुरू आहे. ॲण्टिबॉडीजची तपासणी केल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होतो. यावर संशोधन सुरू आहे.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा