जि.प.च्या सातशे शाळा घेणार दत्तक
By Admin | Updated: June 14, 2016 23:53 IST2016-06-14T23:40:29+5:302016-06-14T23:53:11+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारावा, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून जि.प.चे अधिकारी आणि कर्मचारी हे जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळा दत्तक घेणार आहेत

जि.प.च्या सातशे शाळा घेणार दत्तक
औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारावा, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून जि.प.चे अधिकारी आणि कर्मचारी हे जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळा दत्तक घेणार आहेत. हे अधिकारी, कर्मचारी वर्षभरात तब्बल १० महिने या शाळेला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीवर ‘वॉच’ ठेवतील.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, यासंबंधीचे आदेश आपण आजच (सोमवारी) निर्गमित केले असून, यामध्ये जि. प. तसेच पंचायत समित्यांचे जवळपास ७ अधिकारी- कर्मचारी असतील. हे अधिकारी- कर्मचारी १५ जून अर्थात शाळेच्या प्रवेश दिवसापासूनच या अभियानाला सुरुवात करतील. प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी. शाळेत दर महिन्याच्या मंगळवारी दत्तक घेतलेल्या शाळेत सकाळी परिपाठापासून दुपारच्या मध्यान्ह भोजनापर्यंत अधिकारी- कर्मचारी शाळेत थांबतील. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभागही वाढेल आणि शाळेची भौतिक तसेच शैक्षणिक सुधारणा होईल. दैनंदिन अडचणी सोडविणे सोपे जाईल.
वर्षातील दहा महिन्यांचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून, ते सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना शाळा दत्तक योजनेची कल्पना देतील. सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील एक-एक शाळा दत्तक दिली जाणार असून, प्रत्येकाने शाळेला वर्षात किमान दहा व्हिजीट करणे आवश्यक आहे. या शाळांमधील मासिक चाचण्या ज्या अगोदर कागदावरच चालायच्या याच्यावरदेखील वॉच ठेवला जाणार आहे.