विभागातूनच ऑनलाइन तासिका घेण्याचा प्रशासनाचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:26+5:302021-06-29T04:05:26+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी ...

विभागातूनच ऑनलाइन तासिका घेण्याचा प्रशासनाचा आग्रह
औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी बसून काय. ऑनलाइन तर तासिका घ्यायच्या आहेत. विद्यापीठात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी, असा सूर काही प्राध्यापकांनी आळवला आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्या वर्षापासून पावसाळ्यात सुरू होणारे प्रथम सत्र हिवाळ्यात, तर हिवाळ्यात सुरू होणारे द्वितीय सत्र पावसाळ्यात सुरू होत आहे. तथापि, मेमध्ये घेण्यात आलेल्या काही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल अद्याप लागलेले नाहीत; परंतु दुसऱ्या सत्रातील नियोजित ६४ तासिका पूर्ण झाल्या पाहिजेत, यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन तासिका सुरू करण्याच्या सूचना प्राध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार जूनच्या १५ तारखेपासून काही विभागांतील प्राध्यापकांनी तासिका सुरू केल्या आहेत; परंतु विद्यापीठातील अनेक विभागांत नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे विभागांत येऊनच तासिका घ्याव्यात, विद्यापीठ प्रशासनाचा हा आग्रह प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी तापदायक ठरला आहे. एक तर विद्यापीठाने सर्व विभागांत सुरळीत चालणारी इंटरनेटची सुविधा द्यावी किंवा प्राध्यापकांना घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची संधी द्यावी, असा सूर प्राध्यापक मंडळीने आळवला आहे.
दुसरीकडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव प्रकाश इंगळे यांनी तर विद्यापीठाच्या ऑनलाइन तासिकांवरच आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी अजूनही विद्यापीठ- महाविद्यालये तसेच वसतिगृहे उघडलेली नाहीत. अनेक विद्यार्थी गावाकडेच आहेत. ग्रामीण भागात देखील नेटवर्कच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑनलाइन तासिकांमध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात, याचा विचार प्राध्यापकांनी करायला हवा. ऑनलाइन तासिका घेत असल्याचा दावा अनेक प्राध्यापकांनी केला असला, तरी अनेकांनी एक- दोन तासिका घेतल्यानंतर पुढे त्या घेतलेल्याच नाहीत. याचा हिशेब प्रशासनाने घेतला पाहिजे.
चौकट......
विभागात असुविधा असेल, तर दुरुस्त करू
यासंदर्भात प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, विद्यापीठाने सर्व विभागांत संगणक व इंटरनेटची सुविधा दिलेली आहे. प्राध्यापकांनी संगणकावर ऑनलाइन तासिका घ्याव्यात. मोबाइल नेटवर्कचा तासिकांसाठी संबंधच नाही. काही ठिकाणी असुविधा असतील, तर प्राध्यापकांनी त्या निदर्शनास आणून दिल्यास त्या दूर केल्या जातील.