साडेचार लाख हेक्टर पेरणीचा खोळंबा
By Admin | Updated: July 15, 2014 00:51 IST2014-07-14T23:25:09+5:302014-07-15T00:51:12+5:30
दिनेश गुळवे, बीड यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने तब्बल साडेचार लाख हेक्टरवरील पेरणीचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षी याच काळात साडेसात लाख हेक्टर पेरणी झाली होती.

साडेचार लाख हेक्टर पेरणीचा खोळंबा
दिनेश गुळवे, बीड
यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने तब्बल साडेचार लाख हेक्टरवरील पेरणीचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षी याच काळात साडेसात लाख हेक्टर पेरणी झाली होती. यावर्षी मात्र आतापर्यंत केवळ साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे यातील सव्वा तीन लाख हेक्टरवरील पेरणी गत चार दिवसांमध्ये झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवल्या होत्या, बियाणेही खरेदी केली होती. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. गतवर्षी जुनच्या सुरुवातीपासूनच पाऊस होता. त्यामुळे ११ जुलै २०१३ पर्यंत तब्बल ७ लाख ८७ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. ही पेरणी सरासरीच्या १४० टक्के झाली होती.
जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीचे क्षेत्र सरासरी ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर आहे. यापैकी गतआठवड्यापर्यंत केवळ २० ते २२ हजार हेक्टवर धूळ पेरणी झाली होती. गुरुवारपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. गुरुवार ते रविवार या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ६३ टक्के म्हणजे ३ लाख ५१ हजार ८२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. ‘पांढरे सोने’ म्हणून गणल्या जाणाऱ्या या पीकाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल केला आहे. त्यामुळे या पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढते आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात तब्बल ३ लाख ८८ हजार ५०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यावर्षी पाऊस नसल्याने आतापर्यंत १ लाख ९७ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात पेरणीनंतर आता पुन्हा पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे काम थांबविले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे. मशागत, बियाणे, पेरणीयावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून शेतकरी धास्तावले आहेत़
खरिपाचे क्षेत्र आणखी वाढेल
जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली होती. यावर्षीही आता पाऊस पडल्याने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पेरणीचे क्षेत्र आणखी वाढेल, असा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक मुळे यांनी व्यक्त केला.
पिकाचा प्रकार२०१४२०१३
(पेरा हेक्टरमध्ये)
ज्वारी८४५०१९४००
बाजरी२९३३३८६५००
मका२८६९११८००
तूर १६८३०३७२००
मूग१८०१११६००
उडीद२००४११४००
सोयाबिन८८४३२१२५१००
कापूस१९७५४३३८८५००