छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेच्या पॅनल बॉक्समध्ये पहाटे ४:३० वाजता उंदीर मामा घुसले. त्यामुळे पॅनल बॉक्समधील केबल जळाली. ट्रान्सफाॅर्मर ट्रिप झाले. दुरुस्तीसाठी महापालिकेला तब्बल नऊ तास लागले. दुपारी १ वाजता पाणीपुरवठा सुरू केला. शहरात पाणी येण्यासाठी सायंकाळचे ६ वाजले. त्यामुळे ज्या नागरिकांना शुक्रवारी, शनिवारी पाणी मिळणार होते, ते पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले.
बुधवारपासून शहर आणि परिसराला वादळवाऱ्याचा तडाखा सहन करावा लागतोय. या वादळवाऱ्यामुळे कधी जायकवाडी तर कधी फारोळ्यातील विद्युत पुरवठा खंडित होतोय. १५ ते २० मिनिटेही विद्युत पुरवठा खंडित झाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतोय. शहरातील पाण्याचे टप्पे अगोदरच विस्कळीत झालेले असताना शुक्रवारी पहाटे फारोळ्यात पॅनल बॉक्समध्ये उंदीरमामा शिरले. त्यामुळे ठिणग्या उडून विद्युत पुरवठा खंडित झाला. मनपाच्या यांत्रिकी विभागाने फॉल्ट शोधायला सुरुवात केली. सकाळी ९ वाजता एका पॅनल बॉक्समध्ये उंदीर शिरल्याचे निदर्शनास आले. उंदीर काढून स्प्रे करून विद्युत यंत्रणा सुरू केली. ट्रान्सफाॅर्मरमधून थोडा धूर निघाला. ट्रान्सफॉर्मर ‘ट्रिप’ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू केली. दुपारी १ वाजता विद्युत पुरवठा सुरू झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
एक दिवस उशिराने पाणीपाणीपुरवठ्याच्या वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले की, ज्या वसाहतींना सहाव्या दिवशी पाणी द्यायचे होते, त्यांना आता आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, रात्री उशिरापर्यंत काही वसाहतींना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान एक दिवस शहराचा पाणीपुरवठा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही.
फारोळ्यात उंदीर, साप नाहीतफारोळा जलशुद्धीकरण केंद्रात कधीही उंदीर, साप घुसत नाहीत. हा प्रकार नेहमी जायकवाडी पाणी उपसा केंद्रात होतो. दोन्ही ठिकाणी उंदीर येऊ नयेत, म्हणून उपाययोजना केल्या आहेत. नेमका उंदीर आला कुठून, हे लक्षात येत नसल्याचे दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.