८२ छावण्यांची झाडाझडती
By Admin | Updated: December 23, 2015 23:59 IST2015-12-23T23:10:53+5:302015-12-23T23:59:04+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड खैरात वाटल्याप्रमाणे जिल्हयात एकाच गावात दोन-दोन छावण्यांना मंजुरी आहे. छावण्या मिळवून मालामाल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचे मनसुभे

८२ छावण्यांची झाडाझडती
सातारा : घड्याळात दहाचे ठोके पडताच ‘त्या’ दहा जणी शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशकर्त्या झाल्या. शनीला नमस्कार करून दहा मिनिटे चौथऱ्यावरच बसल्या. हात जोडून उपासना केली. सत्याग्रह संपताच दहा मिनिटांत शनी देवस्थानने चौथऱ्याचे गोमूत्राने ‘शुद्धीकरण’ केले. उभयपक्षी शांतता आणि संयमाचा मार्ग स्वीकारला गेल्याने वातावरण फारसे तापले नाही आणि बंदोबस्तासाठी आलेल्या दहा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.सोळशी (ता. कोरेगाव) येथील शनिमंदिर देवस्थान जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शनिशिंंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांनी प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून नुकताच मोठा गदारोळ झाला. तेथील ट्रस्टींनी महिलांना चौथऱ्याजवळ अडविले होते. त्यांनी स्त्रीत्वाचा अवमान केल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, सोळशी येथील शनिचौथऱ्यावर प्रवेश करण्याच्या राज्य महिला लोक आयोग संघटनेच्या निर्णयानंतर काय होणार याची उत्सुकता होती. तथापि, शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी सोळशीत शनिचौथऱ्यावर जाण्यापासून महिलांना अडविणार नाही; मात्र त्यांना समजावून सांगू, अशी भूमिका घेतल्याने सत्याग्रह शांततेत पार पडणार याची नांदी झाली होती. बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास आंदोलनकर्त्या महिलांची वाहने सोळशीच्या शनैश्वर देवस्थानच्या आवारात दाखल झाली. मठात जाताच स्वत: नंदगिरी महाराजांनी महिलांचे स्वागत केले. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अॅड. वर्षा देशपांडे यांची विचारपूस केली. ‘भारतीय संस्कृतीस अनुसरून मी आपले स्वागत करीत असून, धर्मशास्त्र आणि धर्मग्रंथातील उताऱ्यांचे दाखले देऊन आपणास शनिचौथऱ्यावर न जाण्याची विनंती करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांसाठी चहापान, हळदी-कुंकू आणि ओटीभरण अशा थाटात पारंपरिक बाजात स्वागत केले.शनिखंड’ या ग्रंथात असलेली शनीला शाप देणाऱ्या त्याच्या पत्नीची कथा नंदगिरी महाराजांनी महिलांना सांगितली आणि ज्याच्या उघड्या डोळ्यांनी त्याची पत्नीही जळू लागली, तो शनिदेव अत्यंत कडक असल्यामुळे महिला त्याच्या जवळ जात नाहीत, असे सांगितले. शनिदेवाचे समोरासमोर दर्शनही कुणी घेत नाही, असेही नमूद केले. यावर अॅड. वर्षा देशपांडे यांनी भारतीय राज्यघटनेने सर्वांना दिलेल्या उपासनास्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी ‘ठीक आहे. आपण इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळीही जाऊ. मीही तुमच्याबरोबर येतो,’ असे नंदगिरी महाराज म्हणताच थोडा तणाव निर्माण झाला. ‘मी माझ्या धर्मातील अनिष्ट रूढींबद्दलच बोलणार. इतर धर्मातील स्त्रियांना प्रार्थनास्थळात जायचे असेल, तर आम्ही त्यांच्याही मागे उभे राहू,’ असे म्हणून अॅड. देशपांडे यांनी हा मुद्दा खोडून काढला. हळदी-कुंकवाची देवाण-घेवाण सुरू असतानाही वादावादी सुरू होती. परंतु आज या महिला शनिचौथऱ्यावर जाणारच, याची खात्री पटताच नंदगिरी महाराजांनी मवाळ धोरण स्वीकारले.त्यानंतर पायऱ्यांजवळ असलेला फलक महिलांनी काढला. ‘महिलांनी येथूनच परत जावे’ असे या फलकावर लिहिलेले होते. फलक काढल्यानंतर महिला चौथऱ्यावर गेल्या. सुमारे दहा मिनिटे त्या चौथऱ्यावर बसल्या आणि नंतर पुन्हा मठाच्या दिशेने वळल्या. परिसरात असलेल्या एका उभट फलकावर अनेक सूचना लिहिलेल्या होत्या. त्यातील पहिलीच सूचना ‘महिलांनी चौथऱ्यावर जाऊ नये,’ अशी होती. हा फलक काढण्याचा प्रयत्न महिला करीत असताना देवस्थानचे अन्य ट्रस्टी तेथे आले. यात चंदू मोरे, डॉ. अशोक कदम, हणमंतराव वाघ, बाळासाहेब यादव, अविनाश लेंभे यांचा समावेश होता. त्यांनी इतर सूचना आवश्यक असल्याने फलक काढू नये असे सांगितले असता पुन्हा बाचाबाची झाली. ‘आम्ही तुम्हाला चौथऱ्यावर जाण्याचे स्वातंत्र्य दिले ना? मग आता फलक कशाला काढता,’ अशी विचारणा विश्वस्तांनी केली असता, ‘आम्हाला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? स्वातंत्र्य तर आम्हाला राज्यघटनेने दिले आहे,’ असे प्रत्युत्तर अॅड. देशपांडे यांनी दिले. यावरून वाद झाल्यानंतर अखेर विश्वस्तांनीच एकमेकांची समजूत घातली. त्यानंतर सूचना क्रमांक एकवर महिलांनी कागद चिकटवला आणि तेथून त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेल्या. (लोकमत चमू)
बाल-सेवेकऱ्यांनी ओलेत्याने शिंंपले गोमूत्र
सोळशीच्या शनैश्वर देवस्थानमध्ये काही लहानगे सेवेकरी वास्तव्यास आहेत. महिला येऊन गेल्यानंतर गोमूत्र टाकून चौथऱ्याचे शुद्धीकरण करायची सूचना त्यांना देण्यात आली होती. त्यानुसार महिला परत फिरताच दहा मिनिटांनी हे बाल-सेवेकरी चौथऱ्याच्या परिसरात गेले. तेथील जलवाहिनीतील पाणी एकमेकांच्या अंगावर टाकून सर्वजण ओलेचिंंब झाले. ओलेत्याने चौथऱ्यावर चढून सेवेकऱ्यांनी चौथरा आणि शनिदेवाच्या मूर्तीवर गोमूत्र शिंंपण केले. त्यानंतर परिसर पाण्याने धुऊन काढला. नंदगिरी महाराजांनी दुग्धाभिषेक केला.
राज्यघटना आणि धर्मग्रंथ दोन्ही महत्त्वाचे...
घटनतील उपासनास्वातंत्र्याचे पालन करायचे की धर्मग्रंथांनी दिलेल्या नियमांचे, याविषयी वारंवार वादविवाद झडले. दरम्यान, वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शहाजी निकम यांच्या नेतृत्वाखाली दहा पोलीस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडे बोट दाखवून अॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘कायदा आणि घटनेचे पालन करण्यासाठीच पोलीस येथे आले आहेत.’ त्यावर नंदगिरी महाराजांनीही पोलिसांकडे पाहून त्यांचे मत मांडण्यास सुरुवात केली. यावरून वाद वाढू लागताच, ‘राज्यघटना आणि धर्मग्रंथ दोहोंचे पावित्र्य जतन करणे आमचे कर्तव्यच आहे,’ असे उत्तर शहाजी निकम यांनी दिले आणि वादावर पडदा पडला.
धर्मावर हल्ला करू नका...
सोळशी शनैश्वर मंदिरात महिलांचे ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी शनीविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना मठाधिपती म्हणाले, ‘राज्यघटनेने तुम्हाला दिलेल्या धार्मिक हक्काचे पालन करत असताना महिलांनी कोणत्याही प्रकारे धर्मावर हल्ला करू नये. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. शनीचे दर्शन महिलांनी समोरून घेऊ नये, असे धर्मशास्त्र सांगते म्हणून शनीच्या चौथऱ्यावर जाऊन महिलांनी धर्मावर हल्ला करू नये.’
थेट शनिदर्शनाचे वेध
साताऱ्यातून सकाळी आठ वाजता दहा महिलांचा समूह सोळशीच्या दिशेने रवाना झाला. शनीच्या चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेण्याची वर्षानुवर्षे असलेली इच्छा आज पूर्ण होणार, ही भावना अनेकींच्या मनात होती. त्यामुळे शनीभेटीच्या या प्रवासात महिलांनी ओवी, अभंग आणि चळवळीची गाणी म्हणत प्रवास केला.
सहभागी रणरागिणी
सोळशीत चौथऱ्यावरून दर्शन घेण्यासाठी अॅड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली माया पवार, बायडाबाई मदने, सोनाबाई दळवी, बसंती दायमा, सीमा बळीप, वनिता शेळके, कविता बनसोडे, ज्योती रणदिवे आणि जयश्री गोळे सहभागी झाल्या होत्या.
‘तक्रार करू
सोळशीच्या शनिमंदिरात अनेक ठिकाणी महिलांचा धार्मिक हक्कभंग होईल, असा मजकूर लिहिला गेला आहे. ट्रस्टच्या वतीने असा लिहिलेला मजकूर तातडीने काढला गेला नाही, तर त्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन याविषयी लेखी तक्रार करून ट्रस्टची मान्यता रद्द करायला लावू,’ असा इशारा अॅड. वर्षा देशपांडे यांनी दिला.
चौथऱ्यावरून महिलांनी दर्शन घेतल्यानंतर शनीला दुग्धाभिषेक करून चौथऱ्याचे शुध्दीकरण करण्यात आले.
मोठ्या संघर्षानंतरही निरोप देताना भारतीय संस्कृतीला अनुसरून नागेश्वरी गुंडगोळे यांनी अॅड. वर्षा देशपांडे यांची ओटी भरली. मात्र, त्यांच्या आंदोलनाबद्दलची नाराजी नंदगिरी महाराजांच्या चेहऱ्यावर त्यावेळीही दिसत होती.
चौथऱ्यावर प्रवेशानंतर सन्नाटा
महिला एका कोपऱ्यातूनच शनीचे दर्शन घेतात; पण राज्य महिला लोक आयोग संघटनेच्या अध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी चौथऱ्यावर प्रवेश केला आणि अवघ्या वातावरणात भयाण शांतता पसरली. तब्बल दहा मिनिटे चौथऱ्यावर बसून या दहा महिलांनी शनीची आराधना केली. चौथऱ्यावर महिला बसून असेपर्यंत पोलिसांपासून मंदिराच्या ट्रस्टींसह सर्वचजण अवाक् होऊन घडणारा प्रकार विस्फारल्या डोळ्यांनी पाहत होते.
फलक काढू देणार नाही...
महिलांना प्रवेशास मज्जाव करणारे घटनाबाह्य फलक आंदोलनकर्त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने हे फलक हटविण्यास सुरुवात केली. याला आक्षेप घेत मंदिराच्या ट्रस्टींनी ‘तुम्हाला दर्शन घेऊ दिलंय; आता आमचे फलक काढू नका,’ अशी भूमिका घेतली. यावर अॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘राज्यघटनेत महिलेला प्रार्थना करण्यासाठी कोणतेही ठिकाण निषिद्ध नाही. म्हणून असे फलक कायद्याची पायमल्ली करणारे आहेत.’ महिलांना चौथऱ्यावर जाण्यासाठी मज्जाव करणारा काढलेला फलक महिला कार्यकर्त्यांनी मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या पत्नी नागेश्वरी गुंडगोळे यांच्याकडे दिला.
चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवर प्रश्नचिन्ह
शनिमंदिर परिसरात वैदिक शिक्षण घेणारे काही बच्चेकंपनी समोर घडत असलेल्या सर्व प्रकाराचे निरीक्षण करून ऐकत आणि बघत होती. या महिलांच्या रूपाने आपल्यावर धर्मावर अरिष्ट आले असल्याची भावना त्यांची होती, तर दुसरीकडे मठाधिपती नंदगिरी महाराज आणि अॅड. वर्षा देशपांडे यांच्यातील वाक्युद्धानेही ते अवाक् झाले होते. देश चालविण्यासाठी धर्म महत्त्वाचा की कायदा, हे समजण्याचं त्याचं वय निश्चित नव्हतं; पण तरीही जे काही घडतेय ते डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणूनच तर चार-चारदा त्यांना आत बोलावणे आले, तरीही मोठ्यांच्या नजरा चुकवून ते महिलांनी चौथऱ्यावर केलेला प्रवेश बघत होते आणि त्यावर त्यांच्या आवाक्यानुसार टीकाही करत होते.