जिल्ह्याचा ८० ८३ टक्के निकाल
By Admin | Updated: June 18, 2014 01:30 IST2014-06-18T01:00:49+5:302014-06-18T01:30:33+5:30
हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये जिल्ह्याचा ८०.८३ टक्के निकाल लागला आहे.
जिल्ह्याचा ८० ८३ टक्के निकाल
हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये जिल्ह्याचा ८०.८३ टक्के निकाल लागला आहे.
राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील १२ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १० हजार ३४४ विद्यार्थी (८०.८३ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यामध्ये १ हजार ४२१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३ हजार ५२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ४ हजार ३४७ विद्याथी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ५५ विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
जुन्या अभ्यासक्रमाचा १४ टक्के निकाल
जुन्या अभ्यासक्रमानुसार जिल्ह्यातील २ हजार १०१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैैकी २९६ म्हणजेच १४.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २९४ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील बारा शाळांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यातील बारा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन शाळांचा समावेश आहे. हिंगोली शहरातील खाकीबाबा इंग्लिश स्कुल, अनसूया विद्या मंदिर खटकाळी, जिल्हा परिषद शाळा कुर्तडी, जि.प. शाळा साखरा, जि.प. शाळा कवठा ता. सेनगाव, कळमनुरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बोथी, हरुनिसा उर्दु माध्यमिक विद्यालय आखाडा बाळापूर, सह्याद्री हायस्कुल वसमत, संगमेश्वर ज्ञानमंदिर जयपूर, संत नामदेव माध्यमिक विद्यालय वाघजाळी, माध्यमिक आश्रमशाळा बाभुळगाव आणि जवळा येथील एमआयपी उर्दु हायस्कुल या शाळांचा समावेश आहे.
दोन शाळांचा शुन्य टक्के निकाल
जिल्ह्यातील दोन शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्यामध्ये हिंगोलीतील सरकळी येथील सत्य गणपती माध्यमिक विद्यालय व देवजना येथील कोणार्क केंद्रीय निवासी आश्रमशाळेचा समावेश आहे.
मुलींनीच मारली बाजी
दहावीच्या परिक्षेत मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७ हजार ४४२ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैैकी ५ हजार ७५७ म्हणजेच ७८. ४१ टक्के मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. जिल्ह्यातील ५ हजार ४५५ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ५८७ म्हणजेच ८४.०९ मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या.
मराठवाड्यात हिंगोली जिल्हा चौथ्या क्रमांकावर
शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, बीड, परभणी, जालना व हिंगोली या पाच जिल्ह्यांमधून निकालात हिंगोली जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. पहिल्या क्रमांकावर बीड (९१.८८ टक्के) जिल्हा असून दुसऱ्या क्रमांकावर जालना (८८.४५ टक्के) तर तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद (८८.१४) आणि चौथ्या क्रमांकावर हिंगोली (८०.८३ टक्के) जिल्हा आहे. परभणी (७९.१६ टक्के) जिल्हा पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.
संस्कृत विषयामुळे वाढले गुण
हिंगोली : सर्व भारतीय भाषा तसेच प्रमुख विदेशी भाषांचे मुळ किंवा उगमस्थान असलेल्या ‘संस्कृत’ ने दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांचा निकाल उंचावण्यात मोलाची साथ दिली आहे. बहुतांश विद्यार्थी मातृभाषा असलेल्या मराठीसह हिंदी विषयांमध्येही मागे पडल्याचे चित्र असताना अनेकांनी संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण संपादन केले आहेत.
भारतातील एक प्राचीन शास्त्रीय भाषा म्हणून संस्कृतची विशेष ओळख आहे. देशाला एका सुत्रात बांधणारी भाषा म्हणूनही ती ओळखली जाते; परंतु काळानुसार संस्कृत विषयाचे अध्ययन, अध्यापन कमी झाल्याचे दिसत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आठवीपासूनच पाली, संस्कृत हे विषय शिकविण्यात येत आहेत. दहावी-बारावीला अधिक गुण मिळविण्यासाठी तसेच सोपी भाषा असल्याने विद्यार्थी हिंदी किंवा मराठी या भाषा विषयांऐवजी संस्कृतला अधिक पसंती देताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)