५० कोटींचा अपहार
By Admin | Updated: May 8, 2016 01:10 IST2016-05-08T01:04:05+5:302016-05-08T01:10:12+5:30
औरंगाबाद : तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार केली.

५० कोटींचा अपहार
औरंगाबाद : तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार केली. कारखान्याची साखर तारण ठेवून दोन बँकांमधून कर्ज उचलून ५० कोटी रुपयांचा अपहार केला. हा प्रकार मागील चार वर्षांच्या काळात घडला आहे.
या प्रकरणी कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांच्या तक्रारीवरून उद्योजक विठ्ठलराव अंबरवाडीकर, बँक आॅफ बडोदाचे शाखाधिकारी पी. एन. गायकवाड आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे शाखाधिकारी पूनम दर्वे या तिघांविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याने निफाड (जि. नाशिक) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना ‘लीज’वर चालविण्यासाठी घेतला होता. तो कारखाना चालविण्याचे उपकंत्राट अंबरवाडीकर इंडस्ट्रीज प्रा. लि. ला देण्यात आले होते. दरम्यान अंबरवाडीकर यांनी ३१ जानेवारी २०१३ रोजी छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे, बोगस शिक्का आणि बोगस रजिस्टर नंबर तयार करून बँक आॅफ बडोदा (टिळकपथ शाखा) येथून ३० कोटी रुपयांचे कर्ज उचलले.
तसेच त्यानंतर डोंबिवली नागरी सहकारी बँकेतून अशाच खोट्या कागदपत्रांच्या आधारे २० कोटी रुपयांचे कर्ज काढले. विशेष म्हणजे अंबरवाडीकर यांना हे कर्ज देण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनीही मदत केल्याचा आरोप नवपुते यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून माझ्याविरुद्ध अपहार केल्याचे खोटे आरोप करण्यात येत आहेत. हा गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे, असे विठ्ठलराव अंबरवाडीकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अपहार झालेली रक्कम मोठी आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात हा तपास पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांच्याकडे सोपविल्याचेही त्यांनी सांगितले.
निफाडचा कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतल्यानंतर अंबरवाडीकर यांनी ५० कोटींचे कर्ज उचलले, मात्र सर्व पैसा स्वत:च्या कंपनीत वर्ग केला. यामुळे शेतकऱ्यांची देणी, कामगारांचा पगार, सरकारी देणे, तोडणी, वाहतूकदारांचे पैसे, टॅक्स, एक्साईज, असे एकूण ३० कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याचा आरोप नवपुते यांनी तक्रारीत केला आहे.