अर्ध्या किलोमीटरवर ४९ खड्डे

By Admin | Updated: February 1, 2015 00:45 IST2015-02-01T00:45:21+5:302015-02-01T00:45:21+5:30

गजेंद्र देशमुख ,जालना अग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली.

49 pits at half-a-kilometer | अर्ध्या किलोमीटरवर ४९ खड्डे

अर्ध्या किलोमीटरवर ४९ खड्डे


गजेंद्र देशमुख ,जालना
अग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली. शहरात प्रवेश करण्याचा हा मार्ग खड्ड्यांनी आपले स्वागत करतो.
जून २०१४ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. शनिवारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा करण्यात आला. रस्त्याची स्थिती बिकट तर आहेच पण दोन्ही बाजूंनी तब्बल लहान मोठे मिळून ४९ खड्डे आढळून आले. नव्या रस्त्याला ठिगळ लावण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यालाही मुहूर्त मिळालेला दिसत नाही. सहा महिन्यापूर्वी म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. ६८ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे हे काम आनंद कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले आहे. केवळ सहा महिन्यात रस्ता उघडा पडल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान तर आहेच शिवाय पाठ तसेच कंबरेचे विकार वाढल्याचे नागरिक पोटतिडकीने सांगतात.
याविषयी नगर पालिकेचे शहर अभियंता सय्यद सऊद म्हणाले, या रस्त्याच्या कामाविषयी आनंद कन्स्ट्रक्शनला सूचना देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात या रस्त्याचे काम नव्याने सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वाधिक वर्दळीचा रस्ता !
४ हा रस्ता शहरात सर्वाधिक वर्दळीचा आहे. दररोज ८० ते ९० बसेस याच मार्गावरुन धावतात. त्याचबरोबर ट्रक, कार, इतर वाहने तसेच दुचाकी मिळून हजारो वाहने रस्त्यावरुन धावतात. रस्त्याचे काम मलमपट्टीसारखेच झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे काम अत्यंत बोगस झाले आहे. सहा महिन्यांत रस्ते धोकादायक बनले आहेत. डांबरीकरण किरकोळ झाल्याने वाहन चालविणे कठीण जात आहे.
- शेख अमजद
दाऊद खान
सहा महिन्यांत पुन्हा नव्याने रस्ता करावा लागत आहे. हे जालनेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कंत्राटदारांनी पुन्हा नव्याने रस्ता अथवा डागडुजी करुन करताना काळजी घ्यायला हवी.
- दीपक दहेकर
अग्रसेन चौकातच मोठे खड्डे आहेत. काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. साहित्यही निकषाप्रमाणे वापरण्यात आलेले नाही. डागडुजी न झाल्यास पावसाळ्यात संपूर्ण डांबर वाहून जाणार आहे.
-शेख वसिम शेख सरदार
संबंधित कंत्राटदाराने रस्त्याची डागडुजी करावी. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम झाले आहे. अवकाळी पावसामुळेही डांबर निघाले आहे. वाहनचालकांचे गैरसोय लक्षात घेता रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.
- शेख अफसर

Web Title: 49 pits at half-a-kilometer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.