३६२ वाचनालयांना टाळे?
By Admin | Updated: July 6, 2014 00:35 IST2014-07-06T00:29:18+5:302014-07-06T00:35:49+5:30
अशोक कारके ,औरंगाबाद शासनाच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या मराठवाड्यातील ३६२ सार्वजनिक वाचनालयांची मान्यता रद्द करायची की नाही, यावर १० व ११ जुलै रोजी येथे सुनावणी होणार आहे.

३६२ वाचनालयांना टाळे?
अशोक कारके ,औरंगाबाद
शासनाच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या मराठवाड्यातील ३६२ सार्वजनिक वाचनालयांची मान्यता रद्द करायची की नाही, यावर १० व ११ जुलै रोजी येथे सुनावणी होणार आहे. २०१२ मध्ये राज्याच्या महसूल विभागाने मराठवाड्यातील एकूण ४ हजार २६० वाचनालयांची पाहणी केली होती व त्यात ३६२ वाचनालयांनी अटींची पूर्तता केली नसल्याचे आढळले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षण विभागाने केलेल्या शाळांच्या पटपडताळणीच्या धर्तीवर राज्यातील वाचनालयांचीही तपासणी महसूल विभागाने केली होती. या तपासणीत वाचनालयाची इमारत, टेबल, खुर्ची, कपाट, पुस्तके, मासिके, पाक्षिके, दैनिके व वाचनालयातील लेख्यांची (रेकॉर्ड) तपासणी करण्यात आली होती. नियम ७० ची अंमलबजावणी न करणाऱ्या वाचनालयांना अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी तीन महिने मुदत देण्यात आली होती.
या मुदतीतही औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील एकूण ३६२ वाचनालयांनी नियमांची पूर्तता केलेली नाही. याच वाचनालयांची सुनावणी या दोन दिवसांत होणार आहे. मराठवाड्यात ३१ मार्च २०१३ पर्यंत वाचनालयांची संख्या ४ हजार २६० होती. अनेक मंडळांनी तपासणीचा धसका घेऊन नियमांची पूर्तता केल्यामुळे त्यांची मान्यता काढण्यात आली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
गावातील अनेक वाचनालये मंडळ व पदाधिकाऱ्यांतील वाद व राजकारणामुळे बंद पडले आहेत. ‘अ’ वर्ग प्राप्त वाचनालयांची संख्या नांदेड व लातूर जिल्ह्यांत सर्वाधिक म्हणजे १० असून, सर्वांत कमी हिंगोलीमध्ये ३ आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३८८ वाचनालये ‘ड’ वर्गातील आहेत. औरंगाबादमध्ये ‘अ’ वर्गातील ८ आणि ‘ड’ वर्गातील १९९ वाचनालये आहेत.
विभागातील ३६२ वाचनालयांच्या मान्यतेसंदर्भात १० व ११ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात मंडळाने दाखल केलेल्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे, असे विभागीय ग्रंथालय अधिकारी गाडेकर यांनी सांगितले.
वाचनालयांची दुरवस्था...
औरंगाबाद : महापालिकेने शहरात लाखो रुपये खर्चून उभारलेल्या वाचनालयांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाखो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहेत.
मनपाची खडकेश्वर, कटकटगेट, हडको परिसर आणि बन्सीलालनगर येथे वाचनालये आहेत. या सर्व वाचनालयांत मिळून १ लाख २५ हजार पुस्तके आहेत. सर्वाधिक दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयांत आहे. बन्सीलालनगर येथील वाचनालयाची अवस्था पहिल्यास येथे कोणी येते का, असा प्रश्न निर्माण होतो. वाचनालय एका खोलीत असून, अपंगांसाठीच्या तीनचाकी सायकली येथे पडून आहेत. प्रवेशद्वारासमोरच वाचकांसाठी ठेवलेले दोन टेबल स्वच्छ केले नसल्यामुळे त्यावर धूळ साचली आहे. दोन खुर्च्या असून, त्याही मोडलेल्या. वाचनालय उघडण्याची वेळ सायंकाळी असल्यामुळे रोज पाच ते सहा दैनिके वाचनालयावर असलेल्या मनपाच्या नगररचना कार्यालयातील कर्मचारी घेऊन जातात. त्यामुळे सकाळी आलेल्या वाचकांना वर्तमानपत्रे मिळतच नाहीत. खडकेश्वर येथील वाचनालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे वाचकांना पाण्यासाठी बाहेर जावे लागते. या वाचनालयाची नियमितपणे स्वच्छता करावी, नवीन व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची खरेदी करावी, दैनिकांची संख्या वाढवावी, सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशा अपेक्षा वाचकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.