स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:22 IST2019-05-25T23:21:39+5:302019-05-25T23:22:17+5:30
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला.

स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा
औरंगाबाद : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला. या अभियानात महापालिकेचे १२२० कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था, बचत गटांचे १११९ प्रतिनिधी उपस्थित होते.
महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून ‘आओ शहर सुंदर बनाये’ हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी अभियानातील पहिल्या टप्प्यात तब्बल ३२२ टन कचरा गोळा करून तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पोहोचविण्यात आला. शहरातील नऊ प्रभागांत अभियान राबविण्यात आले. सकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा येथे महापौरांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डॉ. निपुण विनायक, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंग मलके, नगरसेविका सुरेखा सानप, जयश्री कुलकर्णी, कीर्ती शिंदे, अर्चना नीळकंठ, ज्योती मोरे, सायली जमादार, शोभा बुरांडे, अतिरिक्त आयुक्त मंजूषा मुथा, संतोष कवडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्टसिटीच्या अंजू उप्पल, प्रशांत नरवडे, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, वॉर्ड अधिकारी, जवान, सफाई कामगार, ७० ते ८० महिला बचत गट कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी, महापालिका शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मोहिमेचे ठिकाण
बीबीका मकबरा परिसरातील मोकळी जागा, बसस्थानक, रहेमानिया कॉलनी येथील उद्यान व वाचनालय, चिकलठाणा विमानतळ परिसर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर परिसर, एमआयटी महाविद्यालय ते महानुभाव आश्रम रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्याचा परिसर, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल, रेल्वेस्टेशनलगत असलेल्या मोकळ्या जागा स्वच्छ करण्यात आल्या.