नवमतदारांत २५ हजारांनी वाढ
By Admin | Updated: July 30, 2014 01:01 IST2014-07-30T00:36:16+5:302014-07-30T01:01:21+5:30
जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने ९ ते ३० जून या दरम्यान राबविलेल्या मतदार
नवमतदारांत २५ हजारांनी वाढ
जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने ९ ते ३० जून या दरम्यान राबविलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेतून २५ हजार ४७५ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुषंगाने स्थानिक निवडणूक विभागाने जालना जिल्ह्यात ९ ते ३० जून दरम्यान मतदार याद्यात नाव समाविष्ट करण्याची विशेष माहिम राबविली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत जिल्ह्यातील २५ हजार ४७५ नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत २५ हजाराने नवमतदारांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख २५ हजार ८०० एवढी झाली आहे.मतदार नोंदणी मोहिमेत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. यादीत नावे नसलेल्या व्यक्तींना, यादीतील नावात, तपशीलात दुरूस्तीसाठी व नावे वगळणीसाठीही या मोहिमेतून संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यातून ही वाढ झाली आहे.अंतिम मतदार यादी ३१ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यामध्ये वाढ किंवा आकडा कमी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
वाढलेले नवमतदार
परतुर मंठा तालुक्यात ४४६१
घनसावंगी ४८७६
जालना ७२६४
बदनापूर ३८९७
भोकरदन जाफराबाद ४९७७ असे जालना जिल्ह्यात एकूण २५ हजार ४७५ नवमतदारांची वाढ झाली.
१६ लाख २५ हजार ८०० मतदार सध्या जिल्ह्यात असून जनजागृती मोहिमेमुळे ते शक्य झाले आहे.
महिला व युवकांचा प्रतिसाद
पुर्नरिक्षण मोहिमेत नव मतदारांनी विशेषत: युवा मतदार, महिलांनी मोठा सहभाग नोंदविला, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली.
तसेच निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत महिला मतदार व १८ ते १९ या वयोगटातील मतदारांचे प्रमाण वाढविण्याकरीता पात्र मतदारांना निरंतर प्रक्रियेअंतर्गत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जोशी यांनी केले.