संचारबंदीतही जिल्ह्यात वाढले २२ हजार कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:02 IST2021-05-05T04:02:01+5:302021-05-05T04:02:01+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु संचारबंदी लागू झाल्यानंतरही गेल्या १५ ...

संचारबंदीतही जिल्ह्यात वाढले २२ हजार कोरोना पाॅझिटिव्ह
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु संचारबंदी लागू झाल्यानंतरही गेल्या १५ दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात २२ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यापूर्वीच्या १५ दिवसांतही एवढीच म्हणजे २२ हजार रुग्णांची वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे.
राज्यात संचारबंदी असली तरी शहरातील अनेक भागात मुक्तसंचार पहायला मिळत आहे. त्यातही ग्रामीण भागात कोणत्याही निर्बंधाचे पालन होताना दिसत नाही. परिणामी शहरातील रुग्णसंख्येत घट होताना आणि ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे. जिल्ह्यात रोज एक ते दीड हजारांवर रुग्णांचे निदान होत होते. मात्र, २ मे रोजी ८३५ रुग्णांचे निदान झाले. शिवाय रोज एक हजारांवर रुग्ण उपचार घेऊन घरी परतत आहे. परंतु संचारबंदीत जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली, अशी तर सध्या परिस्थिती नसल्याचे रुग्णसंख्येवरून पहायला मिळत आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान जेवढे नवे रुग्ण वाढले आणि जवळपास तेवढेच रुग्ण १५ एप्रिल ते १ मेदरम्यान वाढले. परंतु कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार हजारांनी वाढली. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली.
------
अ)३१ मार्च ते १४ एप्रिल
-टेस्टिंग- ४०,७२८
पाॅझिटिव्ह-२२,११७
रुग्णालयातून सुटी-२१,१८२
पाॅझिटिव्हिटी रेट-२१.४१ टक्के
कोरोनामुक्तीचा रेट-२०.५१ टक्के
-----
ब) १५ एप्रिल ते १ मे
-टेस्टिंग-५३,५८३
पाॅझिटिव्ह-२२,०८७
रुग्णालयातून सुटी-२५,७४५
पाॅझिटिव्हिटी रेट-१७.६२ टक्के
कोरोनामुक्तीचा रेट-२०.५३ टक्के
---
नव्या रुग्णांत, सक्रिय रुग्णात घट
जिल्ह्यात १५ एप्रिल रोजी १५ हजार ८०२ सक्रिय रुग्ण म्हणजे रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण होते. ही संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. जिल्ह्यात रविवारी ११ हजार ७७ सक्रिय रुग्ण होते. जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा रुग्णालयांतून सुटी होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे. निर्बंधामुळे विनाकारण घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास हातभार लागत आहे.
---
ग्रामीण भागात वाढले रुग्ण
काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहात आहे. दररोज ग्रामीण भागातच अधिक रुग्णांचे निदान होत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ४ हजार १७१ रुग्ण हे शहरातील आहेत, तर ग्रामीण भागातील ६ हजार ९०६ रुग्ण आहे. ग्रामीण भागात निर्बंधांचे पालन होत नसल्याची परिस्थिती आहे. मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष होते. सोशल डिस्टन्सचे पालनही होत नाही. परिणामी, कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरवले आहे. आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. तपासण्यांची संख्या वाढविली आहे.
--------