२१.५ लाख पुस्तके मिळणार मोफत
By Admin | Updated: June 15, 2014 00:57 IST2014-06-15T00:05:36+5:302014-06-15T00:57:02+5:30
लातूर : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत.

२१.५ लाख पुस्तके मिळणार मोफत
लातूर : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. त्यामुळे १०० टक्के विद्यार्थ्यांच्या हातात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके पडतील़
जिल्हा परिषदेने लातूर जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ४६ हजार २२९ पाठ्यपुस्तकांची भांडार विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारपर्यंत २० लाख ९४ हजार ७६७ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. याची टक्केवारी ९८ टक्के असली तरी सोमवारपर्यंत उर्वरित २ टक्के पुस्तकेही वाटप केले जातील, असे भांडार व्यवस्थापक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील शाळांसाठी ७ लाख ९६ हजार ४३६ स्वाध्याय पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. पैकी ६ लाख ८२ हजार ४१८ स्वाध्याय पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. देवणी, उदगीर तालुक्यांसाठी शुक्रवारी उर्वरित स्वाध्याय पुस्तके पाठविण्यात आले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाने मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांवर जबाबदारी...
पाठ्यपुस्तकांच्या योग्य नियोजनासाठी त्या-त्या तालुक्यातील अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्या दिवशी पुस्तके पडावीत यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सांगितले.२