२१ तंत्रनिकेतनांमधील १५00 जागा रद्द
By Admin | Updated: June 10, 2014 00:59 IST2014-06-10T00:39:38+5:302014-06-10T00:59:16+5:30
औरंगाबाद : विविध चार कोर्सेसला प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी मिळत नसल्यामुळे राज्यातील २१ खाजगी तंत्रनिकेतन संस्थांमधील १ हजार ५०० जागा कमी करण्यात आल्या आहेत.

२१ तंत्रनिकेतनांमधील १५00 जागा रद्द
औरंगाबाद : विविध चार कोर्सेसला प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी मिळत नसल्यामुळे राज्यातील २१ खाजगी तंत्रनिकेतन संस्थांमधील १ हजार ५०० जागा कमी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) कोर्सेसच्या सर्वाधिक ६६० जागांचा समावेश आहे. असे असले तरी राज्यातील ३२ तंत्रनिकेतनांमध्ये १ हजार ५७० जागा वाढविण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर खाजगी तंत्रनिकेतन संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. या संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम चालविण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स या कोर्सेसला पुरेसे विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांना हे कोर्सेस चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे हे कोर्सेस बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासंदर्भात त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयास कळविले होते. त्याआधारे शासनाने ६ जून रोजी राज्यातील २१ संस्थांमधील विविध कोर्सेसच्या १ हजार ५०० जागा रद्द करण्यात येत असल्याचे कळविले आहे. यात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसच्या सर्वाधिक ६६० जागांचा समावेश आहे. राज्यातील २१ संस्थांमध्ये मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील एका संस्थेचा समावेश असल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी सांगितले.