जिल्ह्यात २० टक्केच पीक कर्ज वाटप!

By Admin | Updated: June 15, 2014 00:59 IST2014-06-15T00:36:40+5:302014-06-15T00:59:50+5:30

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे.

20 percent crop loan allocation in the district! | जिल्ह्यात २० टक्केच पीक कर्ज वाटप!

जिल्ह्यात २० टक्केच पीक कर्ज वाटप!

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. शुक्रवारपर्यंत केवळ २० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसमोर बी, बियाणे खते खरेदी आणि पेरणीसाठी पैसा नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वारंवार बँकेत खेटे मारूनही कर्ज वितरित होत नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी सावकारांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.
या जिल्ह्यास गेल्या खरीप हंगामात ६२४. ५१ लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; परंतु महसूल प्रशासनाने बँकांच्या मागे मोठा तगादा लावल्यानेच ७१३ कोटी रुपयांचे पीकइकर्ज वितरित झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वितरीत झाले. गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती. फेब्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. गेल्या दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ पाठोपाठ गारपिटीच्या संकटाने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. या संकटातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे.
गेल्या महिनाभरापासून खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमीन सज्ज केली असून, मोठा पाऊस पडल्यास पेरणी सुरु होणार असे चित्र आहे. परंतु, बँकांकडून आजपर्यंत एक नया पैसाही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही, असे चित्र आहे. शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु बँका कासवगतीने कर्ज वाटप करत आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांची पदोपदी अडवणूक करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना बँकेत दररोज चकरा माराव्या लागत आहेत. आज या, उद्या या, तुमच्या कागदपत्रांत काही त्रुटी आहेत, अशा अनेक गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
यावर्षी खरीप हंगामाचे ७९७ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे; परंतु ७ जूनपर्यंत १५३ कोटी ७३ लाख एवढे म्हणजे सरासरी २० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ कोटी ९९ लाख पीक कर्ज वाटप केले, ग्रामीण बँकेने ४४ कोटी २१ लाख, सहकारी बँकने ८६ कोटी ५१ लाख, खाजगी बँकेने ६ कोटी २ लाख पीक कर्ज वाटप केले आहे.
जिल्हा आग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश बोरूडे म्हणाले, लवकरच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. खरीप आणि रब्बीचा असा १ वर्षाचा ९६६ कोटी २५ लाख पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. येत्या १ आक्टोबरपासून रब्बीचे देखील पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकरी सावकारांच्या दारात...
खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज प्रक्रियेची कागदपत्रे तयार केली. मात्र बँकांच्या अडचणुकीच्या धोरणामुळे, उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्ज न मिळाल्यास नाईलाजास्तव सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.

Web Title: 20 percent crop loan allocation in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.