‘केबीसी’त जालन्यातून २० कोटींची गुंतवणूक
By Admin | Updated: July 24, 2014 00:14 IST2014-07-23T23:52:21+5:302014-07-24T00:14:50+5:30
जालना : चार वर्षात तिप्पट रक्कम देण्यासह विविध आमिषे दाखवून लोकांकडून लाखो रूपयांची गुंतवणूक मिळविणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड कंपनी विरोधात जिल्ह्यातून आतापर्यंत ७५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

‘केबीसी’त जालन्यातून २० कोटींची गुंतवणूक
जालना : चार वर्षात तिप्पट रक्कम देण्यासह विविध आमिषे दाखवून लोकांकडून लाखो रूपयांची गुंतवणूक मिळविणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड कंपनी विरोधात जिल्ह्यातून आतापर्यंत ७५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात सुमारे २० कोटी रूपयांची फसवणूक झाली. ही प्रकरणे आता नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडे वर्ग केले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यात ४ ते ५ हजार लोकांनी केबीसीत गुंतवणूक केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. फसवणुकीचे सर्वाधिक प्रकार हे घनसावंगी, गोंदी आणि आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. केबीसीने आकर्षक कमिशन देऊन विमा एजंट व पिग्मी कलेक्टरांना हाताशी धरून अतिशय कुशलतेने योजनांचा प्रसार आणि प्रचार केला आहे. जिल्ह्यातील काही एजंटही नेमले होते. फसवणूक झालेल्या लोकांनी थेट पोलिस अधीक्षकांकडेही तक्रारी केल्या आहेत. दुप्पट व तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे २० कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)