१२७२ रुग्णांनी घेतला ‘जीवनदायी’चा लाभ
By Admin | Updated: May 20, 2014 01:14 IST2014-05-20T01:02:40+5:302014-05-20T01:14:49+5:30
उस्मानाबाद : सर्वसामान्यांना नवजीवन देणारी राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यामध्ये २१ नोव्हेंबरपासून कार्यान्वित झाली आहे.
१२७२ रुग्णांनी घेतला ‘जीवनदायी’चा लाभ
उस्मानाबाद : सर्वसामान्यांना नवजीवन देणारी राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यामध्ये २१ नोव्हेंबरपासून कार्यान्वित झाली आहे. जवळपास मागील सात महिन्यात १ हजार २७२ रूग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, यापोटी शासनाकडून २ कोटी ९९ लाख ८८ हजार १०० रूपये संबंधित दवाखान्यांना मंजूर करण्यात आले आहेत. अनेक गंभीर आजारांच्या वेदना सोसत जगणार्या रूग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे. योजनेच्या माध्यमातून एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबासाठी (पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी शिधापत्रिका धारक) लाभ देण्यात येत आहे. या योजनेतून तब्बल ५५२ महिला व ७२० पुरूष अशा एकूण १ हजार २७२ गंभीर आजारांवर प्रमाणित करण्यात आलेल्या दवाखान्यांतून शस्त्रक्रिया करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४५० रूग्णांनी आरोग्य मित्र कक्षाकडे अर्ज केले होते. यात ६२६ महिला व ८२४ पुरूष रूग्णांचा समावेश आहे. या कक्षाकडून जवळपास हे सर्व प्रस्ताव सोसायटीकडे मंजुरीसाठी पाठविले होते. मात्र, सोसायटीने १ हजार २७२ रूग्णांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. उर्वरित प्रस्तावांमध्ये विविध स्वरूपाच्या त्रुटी निघाल्या आहेत. दरम्यान, ज्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली, त्यापैकी ३४५ रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याचे डॉ. कुलदीप शिरपूरकर म्हणाले. (प्रतिनिधी) किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख किडनी प्रत्यारोपणासाठी अधिक खर्च येतो. ही बाब लक्षात घेवून शसनाने अन्य आजारांच्या तुलनेत किडनी प्रत्यारोपणासाठी अधिक तरतूद केली आहे. अशा रूग्णांवर अडीच लाखाच्या मर्यादेत खर्च करण्यात येत आहे. जीवनदायी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात. यामध्ये उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालय, सुविधा रूग्णालय, निरामय रूग्णालय व उमरगा येथील शेंडगे रूग्णालयाचा समावेश आहे. ५५२ महिला व ७२० पुरूषांचा समावेश जिल्ह्यातील १६ लाख ५७ हजार लोकसंख्येपैकी २ लाख ३४ हजार २०४ कुटुंबातील सुमारे ११ लाख ७७ हजार ९९१ सदस्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यामध्ये पिवळे कार्डधारक १६ हजार ७००, अंत्योदय व अन्नपूर्णा ३९ हजार १४२ तर केशरी कार्डधारक कुटुंबांची संख्या ८८ हजार ३६२ इतकी आहे.