जिल्ह्यात सुरू होऊन १२४ शाळा पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST2021-07-29T04:06:08+5:302021-07-29T04:06:08+5:30

--- औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन आठवडे सरले. पहिल्या दिवशीपासून ...

124 schools closed again in the district | जिल्ह्यात सुरू होऊन १२४ शाळा पुन्हा बंद

जिल्ह्यात सुरू होऊन १२४ शाळा पुन्हा बंद

---

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन आठवडे सरले. पहिल्या दिवशीपासून शाळांना गावकरी, पालकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने २९ टक्क्यांवरची उपस्थिती वाढून ५९ टक्क्यांवर पोहोचली. मात्र, त्यानंतर पुन्हा गावात कोरोना रुग्ण आढळल्याने १२४ शाळा बंद कराव्या लागल्या, तर सध्या ५७८ शाळा उघड्या असून, दररोज वर्ग भरत आहेत.

जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांनी शाळांची उपस्थिती, वाऱ्या वादळाने झालेले नुकसान, बालविवाह, शिक्षक समायोजनासंबंधीचा आढावा शुक्रवारी घेतला. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीला मुदतवाढ द्या, अन्यथा नव्याने शाळा समित्यांची निवड करा, अशी शिफारस शासनाला केली आहे, तर नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात जिथे कोरोनाचा उद्रेक नाही त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसण्यासह ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे व तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षण समितीने राज्य शासनाकडे केल्याचे गलांडे यांनी सांगितले. बैठकीला शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण, सदस्य पुष्पा काळे, शिल्पा कापसे, रेणुका जाधव, बबन कंदारे, बळिराम भुमरे, प्रभाकर पवार यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.

उपस्थिती ३० टक्क्यांनी वाढली

जिल्ह्यातील १३५१ शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यापैकी महिनाभरापासून कोरोनामुक्त गावांत ५७८ शाळांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने सध्या अकरावीचा वर्ग बहुतांश ठिकाणी भरत नाही. १५ जुलैला २९ टक्के उपस्थिती होती, तर १९ जुलैच्या उपस्थितीनुसार सुरू असलेल्या ४३२ शाळांत ३९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. आठवडाभरात विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्क्यांनी वाढून ५९ टक्के झाली.

---

तालुका : एकूण शाळा -सुरू शाळा - सुरू होऊन बंद

औरंगाबाद -५८९ -९२ -१६ -

कन्नड -९९ -७१ -१८

खुलताबाद -५५ -४१ -७

गंगापूर -११९ -५७ -१७

पैठण -११२ -६१ -१८

फुलंब्री -९७ - ५८ -८

वैजापूर -१२८ - ५१ - १९

सिल्लोड -१२२ - १२० -१४

सोयगांव - ३० - २६ - ७

Web Title: 124 schools closed again in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.