११२ जलस्त्रोतांचे अधिग्रहण बळीराजा हवालदिल.
By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-05T00:35:20+5:302015-01-05T00:36:53+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदाही सरासरी पन्नास टक्केच्या आसपासच पाऊस झाला

११२ जलस्त्रोतांचे अधिग्रहण बळीराजा हवालदिल.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदाही सरासरी पन्नास टक्केच्या आसपासच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांमध्ये अवघा १५.८९ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ६२ गावांसाठी ११२ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले. त्याचप्रमाणे पाच गावांची सात टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. तर रबीही हाती लागेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाच बँकांनीही रबी पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत हात आखडता घेतला आहे. ३२५ कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना डिसेंबर २०१४ अखेर अवघे २५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे वर्षभरात तब्बल ७२ शेतकऱ्यांनी मागील १३ महिन्यांमध्ये मृत्यूला जवळ केले. असे असतानाच आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, ज्वारीचे पीकही आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच संकटात लोटला गेला आहे. आर्थिक संकटात पिचलेल्या या बळीराजाला भरीव मदतीची गरज आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या तब्बल ६२ गावांमध्ये जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर पाच गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाईच्या झळा उस्मानाबाद तालुक्यातील गावांना जाणवत आहेत. ३५ गावांसाठी ६७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे उमरगा तालुक्यातील पाच गावांमध्ये ५, लोहारा तालुक्यातील १२ गावांसाठी २५ जलस्त्रोत अधिग्रहीत करण्यात आली आहेत. भूम तालुक्यातही तीन गावांसाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच कळंब तालुक्यातील ३ गावांसाठी ४, वाशी १ गावासाठी ३ आणि परंडा तालुक्यातील ३ गावांसाठी ३ अधिग्रहणे करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये सध्या ७ टँकर सुरु आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी व कावळेवाडी या गावासाठी प्रत्येकी एक, भूम तालुक्यात तीन तर उमरगा तालुक्यातील मातोळा व चिंचोली (ज) या दोन गावांना दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक अधिग्रहणे आणि टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाच्या दप्तरी धडकू लागले आहेत.
उस्मानाबाद : मागील तीन वर्षापासून सातत्याने अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. जिल्हाभरातील २११ प्रकल्पांमध्ये मिळून अवघा १५.८९ टक्के इतका अत्यल्प उपयुक्त साठा आहे. यापैकी ६३ प्रकल्पांची पाणी पातळी ज्योत्याखाली गेली आहे. तर केवळ सहा प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रकल्प असून, २७ मध्यम प्रकल्प आहेत. तर लघु प्रकल्पांची संख्या १९३ इतकी आहे. सद्यस्थितीला २२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्केच्या दरम्यान, ३५ प्रकल्पामध्ये २६ ते ५० टक्केदरम्यान तर ५१ प्रकल्पांमध्ये अवघा २५ टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे ६३ प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याखाली गेली असून, ३४ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. कळंब तालुक्यातील रायगव्हाण, उमरगा तालुक्यातील जकापूर, परंडा तालुक्यातील चांदणी, खंडेश्वर हे प्रकल्प ज्योत्याखाली आहेत. तर उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, येडशी व कसबेतडवळे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा प्रकल्पांमध्ये अवघा ३.६० टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. एकूणच प्रकल्पातील पाणीपातळी भविष्यात चिंतेचा विषय ठरणारी आहे.
उस्मानाबाद : ऐन रबी पेरणीच्या तोंडावर पावसाने ओढ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ५० टक्केच्या आसपास क्षेत्र पेरणीविना आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अत्यल्प ओलीवर पेरणी केली त्या पिकांना पाणी देवून जोपासली असतानाच मागील आठवडाभरात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला आहे. त्याचप्रमाणे ज्यारीची पिकेही अक्षरश: आडवी झाली आहेत. खरीप पीक हातातून गेल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी पुन्हा जास्तीच्या संकटात लोटला गेला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यामध्ये आजवर तब्बल ७२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी अवघ्या २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच प्रशासनाकडून मदत वाटप करण्यात आली आहे. तर ३३ प्रकरणे मदतीस पात्र ठरत नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. उर्वरित प्रकरणे समिती स्तरावर निर्णयासाठी राखीव असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये तब्बल ७ लाखा ३७ हजार एवढे पशुधन आहे. या पशुधनासाठी जुलै २०१५ अखेरपर्यंत ९ लाख ७ हजार ५०० मेट्रीक टन इतका चारा आवश्यक आहे. मात्र सध्या जिल्ह्यामध्ये ७ लाख ४० हजार मेट्रीक टन इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे १ लाख ६७ हजार ५०० मेट्रीक टन इतका चारा कमी पडत आहे. कृषी विभागाकडून कमी पडणाऱ्या चाऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. ७ हजार हेक्टरवरील नियोजनात ७० हजार मेट्रीक टन, पशुसंवर्धन विभागाकडील १ हजार ६०० हेक्टरवरील नियोजनातून १ लाख ६० हजार मेट्रीक टन आणि ११ हजार हेक्टरवरील उसापासून ८१ हजार ५०० मेट्रीक टन चारा उपलब्ध होवू शकतो, असे सांगण्यात येते. दरम्यान, उमरगा तालुक्यातील पेठसांगवी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसोबतच आता वन्य प्राण्यांनाही टंचाईचे चटके बसत आहेत. वनक्षेत्रामध्ये पाण्याची सोय नसल्याने हरणांसह अन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेवू लागले आहेत. त्यामुळे वनक्षेत्रात पाणवठ्यांची सोय करण्याची गरज निर्माण झाली आहे.